Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 26 October, 2008

सैनिकांना दिले फाटके कपडे! अशीही दिवाळीची 'भेट'

दिल्ली, दि. २५ : विश्वातील सर्वात शीत व उंच युद्धभूमी सियाचिनमध्ये लढाईने नव्हे तर रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळेच जवान मृत्यूमुखी पडतात. म्हणूनच त्यांना विशेष प्रकारचे गरम कपडे देण्याची आवश्यकता असते. परंतु येथे तैनात भारतीय सैनिकांना जुने व ठिगळ जोडलेले कपडे देण्यात आले असल्याचा संतापजनक व तेवढाच खळबळजनक खुलासा महालेखा प्रबंधकांनी (सीएजी) आपल्या अहवालात केला आहे.
सेना मुख्यालयाला योग्यवेळी सियाचिनसारख्या अतिशय थंड भागातील जवानांसाठी विशेष कपडे आणि पर्वतारोहणाकरिता आवश्यक उपकरणे खरेदी करता आली नाही. परिणामी या सामानाच्या प्रमाणात ४४ ते ७० टक्के घट झाली अशी माहिती सीएजीने अहवालात दिली आहे. सीमेवर अहोरात्र पाळत ठेऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना हीच काय दिवाळीची भेट असे म्हणावेसे वाटते.
सुमारे २३ हजार फूट उंचीवरील सियाचिन ग्लेशियर येथे तैनात जवानांना -४० डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी तापमानात जीवन जगावे लागते हे येथे उल्लेखनीय! अशा जवानांना जीवनावश्यक सामानाची पुर्तता करणे ही प्राथमिकता असतानाही जुने कपडे पाठविले. ही कारवाई स्वच्छता, संचालन, उपयुक्तता आणि एकूणच जवानांच्या मनोधैर्यासाठी चांगली म्हणता येणार नाही. पाकिस्तान व चीनच्या सीमेवर असलेल्या सियाचिन भागात भारताचे १९८०० जवान तैनात आहेत.
येथील जवानांच्या ३० टक्के मागण्याही अद्याप लष्कराला पूर्ण करता आल्या नाहीत. जुन्या कपड्यांनीच सध्या भागवत असलेल्या जवानांमध्ये असंतोष खदखदत असल्याचे सीएजीने म्हटले आहे. पुरविण्यात आलेल्या पोशाखाची गुणवत्ता आणि फिटींगबात ५० टक्के डिव्हिजन्स आणि रेजिमेंट्स नाराज आहेत. सर्वाधिक असंतोष पॅण्ट आणि शटर्‌सचा दर्जा, कापड आणि आकारावरून आहे. टोप्या आणि जोड्यांचा दर्जाही तेवढाच निकृष्ट आहे. अशा परिस्थितीतही अशांत सीमेवर देशप्रेमापोटी ढालीप्रमाणे तैनात असलेल्या जवानांचा अभिमान वाटतो.

No comments: