Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 September, 2008

आज विघ्नहर्त्याचे आगमन

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): 'मंगलदिन हा सोनियाचा मंगलमूर्ती मोरया, श्री गणेशा मोरया मंगलमूर्ती ये घरा' दुःख हरण करून सर्वत्र सुखाची बरसात करणारी विद्येची देवता श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी गोमंतकातील समस्त हिंदू लोक सज्ज झाले आहेत. गणेश चतुर्थी निमित्ताने उद्या श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.आज गौरीच्या पूजेने घरांतील गणेशोत्सवास आरंभ झाला असून नवविवाहितांसाठी हा उत्सव महत्त्वाचा मानला जातो.
आज दिवसभर चतुर्थीच्या खरेदीसाठी राजधानी पणजी, मडगाव अन्य शहरांत एकच गर्दी लोटली होती. त्यात खास करून चाकरमानी लोकांचा जास्त समावेश होता. सरकारी तथा खाजगी कर्मचाऱ्यांना काल पगार झाल्याने सामान खरेदीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आज बाजारात गर्दी केली होती. गोव्यात शहरी भागात स्थायिक झालेले लोक गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असल्याने दिवसभरात बसगाड्यांत प्रवाशांची झुंबड उडाली होती. रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट जाणवत होते. विविध सरकारी कार्यालये आज उघडी जरी असली तरी बहुतेक कर्मचारी हे खरेदीत व्यस्त असल्याने काही प्रमाणात या कार्यालयांतही उत्सवाचे वातावरण होते. महागाईमुळे खरेदी करताना सर्वसामान्य लोकांची मात्र बरीच त्रेधातिरपीट उडल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एरवी पणजीत मांडवी नदीच्या तीरावरील फुटपाथवर माटोळीचे सामान विक्रीसाठी घेऊन बसणारे विक्रेते नाहीसे झाले आहेत. जुन्या भाजी बाजाराच्या जागेत फटाक्यांची तात्पुरती दुकाने उभारण्यात आली आहेत. कडधान्ये व इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना भाजी,फळे व फुलांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीचा मोठा फटका बसला आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता हातात मिळणारा पगार व बाजारातील वाढत्या किमती यांचा ताळमेळ घालणेच शक्य नसल्याने यावेळी "कर्ज काढून सण साजरा'करण्याची वेळ आल्याची माहिती देण्यात आली. गोव्यात मटका जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु ऐन चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसायही बंद झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे. दरम्यान, महागाईचा झळ सोसूनही लोकांच्या उत्साहावर मात्र किंचितही परिणाम झाला नाही, अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गांकडून मिळाल्या. महागाई वाढल्याने लोकांकडून निराशा व्यक्त केली जात असली तरी जे हवे ते खरेदी करण्यासही कुणी मागे राहत नाही,अशी माहिती देण्यात आली.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाईने फटाके व रोषणाईला यंदा कमी मागणी होती. चतुर्थीच्या निमित्ताने एरवी जी अन्य खरेदी केली जात होती तीही कमी प्रमाणात झाली. सरकारी मालकीच्या कदंब परिवहन महामंडळाने कारवार, बेळगाव,मंगळूर, हुबळी या मार्गावर जादा बसेस सोडल्या. सर्वाधिक बसेस कारवार मार्गावर सोडल्याचे कदंबच्या सूत्रांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या मंगळूर गाडीवर तर प्रचंड गर्दी झाली . त्यांची डिझेल कारही कधी नव्हे ती या दिवसात भरून जात असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

No comments: