Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 2 September, 2008

आता ब्रम्हपुत्रेचाही कहर आसामात महापूर

गुवाहाटी, दि. २ : कोसी नदीच्या महापुराने बिहारमध्ये लाखो लोक विस्थापित झाले असून अजूनही तेथे पुनर्वसन आणि मदत कार्य सुरू आहे. त्यातच आता आसामामध्येही पुराने थैमान घातले आहे. जवळपास दहा लाख लोक बेघर झाले आहेत. आतापर्यत १५ जणांचा पुराने बळी घेतला असून लष्कराचे जवान पूरग्रस्तांच्या मदतकार्यात गुंतले आहेत. लोकांना वाचविण्यासाठी जवानांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. तसेच वायुदलाची हेलिकॉप्टर्सही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आली आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुत्रेच्या पात्राचे २० ही भराव पुराने फुटल्याने आसामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला असून सुमारे तीन लाख हेक्टर जमीन पुराखाली आली आहे. या महापुराच्या हाहाःकाराने १३४६ गावे होत्याची नव्हती झाली आहेत. महापुरातील हजारो विस्थपित लोक सध्या तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत राहत आहेत.
दरम्यान, यापूर्वी सन २००४ मध्ये आसाममध्ये आलेल्या महापुरात सुमारे २०० हून अधिक लोकंाचा बळी गेला होता.

No comments: