Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 April, 2008

महागाईच्या विरोधात रणरागिणी खवळल्या

भाजप महिला मोर्चाचे राज्यव्यापी आंदोलन
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या महागाईविरोधी आंदोलनाला आज मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत भाजप महिला मोर्चातर्फे राज्याच्या अकराही तालुक्यांत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदारांना यांना महागाईचा निषेध करणारे निवेदन सादर करण्यात आले. ही निवेदने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवण्यात येणार आहेत.
देशाभरात महागाईने कळस गाठल्यामुळे "आम आदमी" भरडला जात आहे. तथापि, केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेते परस्परांवर दोषारोप करत सुटले आहेत. राज्यातील "आम आदमी"चे सरकार खुर्ची सांभाळण्यात दंग आहे. प्रत्यक्षात "आम आदमी' महागाईने जाम झाला आहे. ही महागाई अशीच राहिल्यास लोकांना जगणेच कठीण होईल, अशी भीती भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी व्यक्त केली.
आज येथे तिसवाडी तालुका महिला मोर्चातर्फे मोर्चाच्या सरचिटणीस तथा पणजीच्या नगरसेविका वैदही नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी पणजीच्या नगरसेविका दीक्षा माईणकर, ज्योती मसुरकर, लता वायंगणकर, दीक्षा कांदोळकर, वसुधा तारी, कविता कांदोळकर, सविता खांडेपारकर आदी महिला सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या ११ रोजी पणजी येथील भाजप कार्यालयापाशी तेल व नारळ स्वस्त दरात विक्रीचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाजारात महागाई वाढली असली तरी सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास जीवनावश्यक वस्तू स्वस्तात विकणे शक्य असल्याचा संदेश त्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. गोमंतकीयांनी या आंदोलनात सक्रिय भाग घ्यावा व उपाययोजना करण्यास सरकारला भाग पाडण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: