Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 April, 2008

सिद्धेश व आत्माराम हे इन्सुली आरटीओजवळील प्रसाद गॅरेजमध्ये कामाला होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत ते नदीवर आंघोळीला गेले होते. सिद्धेशला आई वडील नसून तो गॅरेजमध्ये काम करून उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात दोन अविवाहीत बहिणी आहेत. आत्मारामच्या पश्चात आई व बहीण असून त्याची परिस्थिती गरिबीची आहे.

बांदा येथे दोघे
बुडून मृत्युमुखी
तेरेखाल नदीत दुर्घटना

बांदा, दि.10 (वार्ताहर) - येथील तुळसाण पूल तेरेखोल नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले सिद्धेश बाळकृष्ण सावंत (18) रा. इन्सुली पागावाडी व आत्माराम विष्णू सावंत (20) रा. निगुडी सावंतटेंब यांचा आज (गुरुवारी) दुपारी अडीचच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. सिद्धेश, आत्माराम व अनुप दामले हे तिघे आंघोळीसाठी नदीवर गेले होते. सिद्धेश व आत्माराम हे ट्युबच्या मदतीने पोहत होते. त्यावेळी सिद्धेशकडील ट्यूब फुटल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न आत्मारामने केला. तथापि, दोघेही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले. हे पाहताच अनुपने आरडाओरडा केला. त्यावेळी पुलावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने घटनास्थळी धाव घेतली व इतरांना याची माहिती दिली. त्यानंतर विनायक दळवी, गिरीश नाटेकर, श्याम केरकर, विकी केरकर, उदय कुडव यांनी पाण्यात उतरून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस निरीक्षक शंकर चौगुले, उपनिरीक्षक सुनील गांगुर्डे, सभापती बाळा गावडे, तलाठी सुप्रभा पार्सेकर, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक लोकमोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments: