Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 April, 2008

उशिरा कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांची भंबेरी...!

खास पथकाची कार्यालयांना आकस्मिक भेट
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): दक्षता खाते व प्रशासकीय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने आज विविध सरकारी कार्यालयांत दिलेल्या आकस्मिक भेटीत बेशिस्त व उशिरा कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चांगलेच फैलावर घेण्यात आले. उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी तंबी देण्यात येणार असून यापुढे त्याची पुनरावृत्ती घडल्यास दया न दाखवता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल; तसेच त्यासाठी खाते प्रमुखांनाही जबाबदार धरले जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिला.
विविध पातळ्यांवरून सरकारी खात्यातील बेशिस्त तेथे मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या अनेक तक्रारी कामत यांच्याकडे पोहोचल्या आहेत. सध्या अनेक मंत्री आपली खुर्ची वाचवण्याच्या कामात व्यस्त असल्याने प्रशासनावर कोणाचाही वचक उरलेला नाही, असे आरोप होत आहे. याची दखल घेऊन आज सकाळी साडे नऊ वाजता विविध खात्यात विशेष पथकाचे अधिकारी डेरेदाखल झाले. विशेष पथकात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी प्रसाद लोलयेकर (उपनिबंधक), यतींद्र मरळकर (राजभाषा संचालनालय), दत्ताराम देसाई (कारखाने व बाष्पक निरीक्षकालय),संजीत रॉड्रिगीस (वाहतूक) व बी. एस. कुडाळकर (सचिवालय) यांनी भेटी दिल्या. सरकारी सेवा नियमानुसार सकाळी ९.३० वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेवर हजर राहणे बंधनकारक आहे. त्यात दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येतो. मरळकर यांनी राजभाषा संचालनालयाला भेट दिली असता तिथे सकाळी कारकून व दफ्तरी वगळता एकही कर्मचारी वेळेत पोहोचला नसल्याचे आढळले. त्यांचा अपवाद वगळता बाकी सर्व कर्मचाऱ्यांची नोंद "गैरहजर' म्हणून करण्यात आली. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे हजेरीपटावर नियमित सही न करणे, रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंदच हजेरीपटावर नसणे आदी प्रकारही उघडकीस आले. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री कामत यांना सादर करण्यात आला. प्रसाद लोलयेकर यांनी उपनिबंधक कार्यालयास भेट दिली. या खात्यात एकूण पाच कर्मचारी उशिरा पोहोचल्याची नोंद झाल्याचे ते म्हणाले. कारखाने व बाष्पक निरीक्षकालयात कर्मधर्मसंयोगाने सर्वकर्मचारी वेळेवर हजर होते. वाहतूक कार्यालयातही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आपल्या जागेवर हजर नसण्याचा प्रकार उघडकीस आला. सचिवालयातही पाहणी केली असता येथील कर्मचारीही वेळेत हजर राहात नसल्याचे आढळले.
सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने लोकांशी वागावे. कामकाजातील बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही. या प्रकारानंतर एकदा या कर्मचाऱ्यांना तंबी दिली जाणार आहे. मात्र यापुढे हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट आदेश त्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले. यापुढे खातेप्रमुखांना त्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीबाबत जबाबदार धरले जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले.

No comments: