Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 April, 2008

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सुशीलकुमार शिंदे?

नवी दिल्लीत घडामोडींना वेग
राणे केंद्रात मंत्री, विलासराव सरचिटणीस शक्य

नवी दिल्ली, दि. ८ (प्रतिनिधी): अलीकडेच कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जीवदान दिले असले तरी हा आनंद विलासरावांना फार काळ उपभोगता येणार नाही. कारण, मुख्यमंत्रिपदावरून त्यांना हटविण्याचा आणि त्यांच्याजागी सुशीलकुमार शिंदे यांना आणण्याचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय जवळजवळ झालेला आहे, अशी माहिती कॉंगे्रसमधीलच सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, विलासरावांना हटविल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याचे चित्र स्पष्ट करण्यासाठी सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी, ए. के. अँटोनी आणि प्रभा राव यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीने विलासरावांशी चर्चेची पहिली फेरीही पूर्ण केली आहे. ही समिती पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करणार असून, त्या आधारावर सोनिया गांधी विलासरावांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.
२० एप्रिल रोजी राज्य विधानसभेचे अधिवेशन संपत आहे. यानंतर विलासरावांना हटविण्यासाठी वेगाने हालचाली सुरू होणार आहेत. विलासराव सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याच्या तक्रारी अनेक नेत्यांनी दिल्ली दरबारी मांडल्या आहेत. स्वत: सोनिया गांधीदेखील विलासरावांच्या कामावर खुश नाहीत. त्यातच, महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाचे प्रस्थ वाढत चालले असल्याने सोनिया चिंतित झालेल्या आहेत. मायावती यांचा जोर ओसरण्यासाठी दलितांमध्ये लोकप्रिय असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे त्या विश्वासाने पाहात आहेत.
राणे यांच्या नावाचीही चर्चा
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे ही कॉंगे्रस अध्यक्षांची पहिली पसंती असली तरी विलासराव मंत्रिमंडळात महसूल मंत्री असलेले नारायण राणे यांच्याही नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते, राणे यांच्या नावाची प्रदेश कॉंगे्रसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी शिफारस केली आहे.
विलासराव देशमुख आणि नारायण राणे यांच्याकडून पद काढण्यात आल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करणे आगामी निवडणुकीच्या काळात किती आवश्यक आहे याची जाणीव ठेवून कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या उचलबांगडीआधीच त्यांच्या पुनर्वसनाची योजनाही तयार केली आहे. यानुसार, नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाणार आहे आणि विलासरावांना पक्ष संघटनेत सरचिटणीसपद दिले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच राणे यांनी कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्रिपद त्यांचे समाधान करू शकेल काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. राणे नाराज झाले आणि त्यांनी कॉंगे्रस सोडली तर ते राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यताही आहे.
शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यास दलित समाज खुश होईल आणि त्याचा मोठा फायदा कॉंगे्रसला मिळेल, असा सोनिया गांधी यांना विश्वास आहे. पण, केवळ सरकारी स्तरावर फेरबदल करून भागणार नसल्याने राज्यात पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि दलित व ब्राह्मणांची मते जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या जागी या दोन्ही समाजांना एकत्र घेऊन चालणाऱ्या नेत्याचा शोध घेण्यात येत आहे.
राजकीय उलथापालथीचा हा प्रयोग महाराष्ट्रासोबतच उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेशातही करण्याच्या दिशेने सोेनिया गांधी यांनी पावले उचलली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या तिन्ही राज्यांमध्ये सोनियांनी आधीच ब्राह्मण समाजातील नेत्यांना प्रदेशाध्यक्ष या पदी नियुक्त केले आहे.

No comments: