Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 April, 2008

दुकानदारांबाबत ठोस निर्णय नाही

फोंडा शहरातील पदपथ क्षेत्रातील न्यायालयात याचिका दाखल केलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) संध्याकाळी राजीव कला मंदिरात आयोजित बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. पदपथ क्षेत्रातील दुकानदारासमोर पुनर्वसनाबाबत दोन - तीन वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत.
या बैठकीला आमदार तथा गृहमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष संजय नाईक, पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, नगरसेवक किशोर नाईक, सौ. राधिका नाईक, सौ. रूक्मा डांगी, ऍड. वंदना जोग, उपनगराध्यक्ष सौ. दीक्षा नाईक, शैलेंद्र शिंक्रे, दिनकर मुंडये, शिवानंद सावंत, व्यंकटेश नाईक, प्रदीप नाईक, व्हीसेंट फर्नांडिस, पालिका अभियंता विष्णू नाईक आणि दुकान मालक उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले पदपथ क्षेत्रातील दुकान मालक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाच्या संबंधीच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. दुकानदारांसाठी वरचा बाजार, इंदिरा मार्केट येथे पर्यायी जागा उपलब्ध करण्यावर विचार करण्यात आला आहे. दुकानदारांना तीन मीटर जागा देण्याचा प्रस्ताव पूर्वी तयार करण्यात आला होता. त्यानंतर चार मीटर जागा देण्याची मागणी दुकानदारांकडून करण्यात आली होती. या दुकानदारांपैकी काहींना वरचा बाजारात जागा देण्यासंबंधी विचार करण्यात आला. यासंबंधीचा सविस्तर आराखडा तयार करून त्यावर विचार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गाड्यांच्या पुनर्वसनाबाबत ठोस आराखडा तयार नसल्याने दुकान मालक ठोस निर्णय घेण्यास पुढाकार घेत नाही. पदपथ विकासाच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून दुकाने हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बैठकीत सांगण्यात आले. दुकानदारांनी दुकाने उभारण्यासाठी सरकारी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडे केली. दुकानदार आणि पालिका अधिकारी यांनी एकत्र बसून पुनर्वसनाच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

No comments: