Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 April, 2008

'एक आठवडा प्रतीक्षा करा'

ठोस निर्णयाविनाच हरीप्रसाद परतले
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): बाबूश मोन्सेरात यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कॉंग्रेस पक्षात एकमत होत नसल्याने हा निर्णय एक आठवडा पुढे ढकलण्याचे ठरवण्यात आले आहे. बाबूश यांच्यासाठी जागा खाली करून देण्याबाबत धुसफूस सुरू असताना आता नेतृत्वबदलाची चाहूलही लागली असून ठोस निर्णय न घेता पक्षाचे गोवा प्रभारी बी. के. हरीप्रसाद दिल्लीला परतले आहेत.
काल रात्री मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन, आमदार मोन्सेरात आदींशी चर्चा केल्यावर आज हरिप्रसाद यांनी आपला मोर्चा दोनापावला येथील एका तारांकित हॉटेलात वळवला. यावेळी सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पांडुरंग मडकईकर तसेच गृहमंत्री रवी नाईक यांनी त्यांची भेट घेतली. मडकईकरांबरोबर डॉ. काशीनाथ जल्मी, कांता गावडे आदी नेते होते. मडकईकरांचे मंत्रिपद काढून कॉंग्रेसने संपूर्ण गावडा समाजाला वेठीस धरल्यामुळे त्याचे पक्षावर दुष्परिणाम संभवतील, असे या शिष्टमंडळाने हरीप्रसाद यांच्या निदर्शनाला आणून दिले. पक्षश्रेष्ठी श्रीमती सोनिया गांधी यांनी मडकईकर यांना आश्वासन दिल्याने त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी,अशी मागणी या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हरीप्रसाद यांची घेतलेली भेट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सध्या आघाडीअंतर्गत विश्वजित यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष असून मुख्यमंत्री कामत यांचे भवितव्य त्यांच्याच हातात असल्याचे पक्षातील नेतेच सांगत आहेत. यावेळी गृहमंत्री रवी नाईक यांनी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांच्यासोबत हरीप्रसाद यांची भेट घेतली. आमची राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगत रवी नाईक यांनी या विषयावर भाष्य टाळले.
प्राप्त माहितीनुसार विश्वजित पुन्हा एकदा आपले वडील प्रतापसिंग राणे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यास उत्सुक असून त्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव हरीप्रसाद यांच्यासमोर ठेवल्याची जोरदार चर्चा कॉंग्रेस पक्षांत सुरू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वबदलाच्या हालचाली वेगवान झाल्या असताना गोव्यातही नेतृत्व बदलाच्या चर्चेला सुरुवात करण्याची व्यूहरचना काही नेते आखत असल्याचेही कळते.
आज कॉंग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना हरीप्रसाद यांनी बाबूश यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. आपण आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली असून तसा अहवाल दिल्लीत श्रेष्ठींना सादर करणार आहोत मात्र अंतिम निर्णय श्रेष्ठी घेणार असल्याचे ठेवणीतील उत्तर देऊन त्यांनी हा विषय संपवला. आज संपूर्ण दिवसभर बाबूश यांच्यासाठी ज्योकीम आलेमाव यांचा पत्ता काटला जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. आलेमाव बंधूंना मंत्रिमंडळात ठेवून फिलिप नेरी रॉड्रिगीस यांना वगळल्यास त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याने सध्या ज्योकीम यांचेच नाव यादीत "आघाडी'वर आहे. बाबूश यांनीही हा निर्णय एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.

No comments: