Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 January, 2010

"धर्मांतरितांना आरक्षण देणे हा मागास जातींवर अन्याय'

पणजीत अनुसूचित जातींचा मेळावा

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- मागासलेल्या बांधवांना पुढे नेण्यासाठी त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जे आंदोलन उभारले होते तेच आंदोलन पुन्हा एकदा उभारण्याची गरज या समाजावर आली आहे. धर्मांतर करून ख्रिस्ती किंवा मुस्लिम धर्म स्वीकारलेल्यांना अनुसूचित जातीत समावेश करण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस सरकारने आखले आहे. आमचा कोणत्याही धर्मातील बांधवांना विरोध नाही. परंतु, त्यांच्यासाठी आमचा हक्क हिरावून घेऊ नका,असे उद्गार आज अनुसूचित जात आरक्षण बचाव मंचाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा माजी राज्यसभा खासदार रामनाथ कोविंद यांनी काढले. कॉंग्रेस सरकारचा "रंगनाथ मिश्र' आयोग हा अनुसूचित जातीतील बांधवांचा हक्क हिरावून घेण्यासाठी बनवण्यात आला असून त्याला राष्ट्रीय स्तरापासून गल्लीबोळापर्यंत विरोध करण्याची गरज आहे. देशाच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीसाठी दिलेले आरक्षण या देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधीही हिरावून घेऊ शकत नाही, असे श्री. कोविंद म्हणाले. हवे असल्यास त्यांना वेगळे पॅकेज द्या, असाही सल्ला त्यांनी दिला.
ते आज पणजी गोमंतक मराठा समाज सभागृहात गोव्यातील अनुसूचित जातींच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, वास्को मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, गोवा अनुसूचित आरक्षण बचाव मंचाचे निमंत्रक विठू मोरजकर व भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री अविनाश कोळी उपस्थित होते.

गेली साठ वर्षे या देशावर सत्ता गाजवणाऱ्या कॉंग्रेस सरकारने हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव का मागासलेले आहेत, याची कारणे शोधून काढण्यासाठी आयोग स्थापन करण्याची गरज आहे. केवळ निवडणुकीच्या वेळीच मुस्लिमांना खूष करण्यासाठी विविध घोषणा करायच्या आणि नंतर घाणेरडे राजकारण खेळायचे ही कॉंग्रेसची जुनी रीत आहे,असे मत यावेळी उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. या आयोगाच्या माध्यमातून कॉंग्रेस सरकार धर्मातराला पाठिंबा देऊन खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप यावेळी श्री. नाईक यांनी केला. भारताची घटना ही आमची गीता आहे. त्यात जे अनुसूचित जातीला अधिकार दिले आहेत, ते मिळालेच पाहिजे. हे कॉंग्रेस सरकार जाती व्यवस्थेला खतपाणी घालून पुन्हा एकदा फाळणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी याच कॉंग्रेसने धर्मांच्या नावाने पाकिस्तान आणि बांगलादेशाची निर्मिती केल्याची आठवण यावेळी श्री. नाईक यांनी उपस्थितांना करून दिली.
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मांत कोणतीही जातीव्यवस्था नाही. मग कोणत्या आधारावर त्यांचा अनुसूचित जातीत समावेश करीत आहात, असा झणझणीत सवाल श्री. आर्लेकर यांनी उपस्थित केला. यावेळी विठू मोरजकर आणि अविनाश कोळी यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीळकंठ मोरजकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने अनुसूचित जातीचे बांधव उपस्थित होते.

No comments: