Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 January, 2010

'कायदा सुव्यवस्थेबाबत कुणीच गंभीर नाही'

मिकी पाशेकोंनी डागली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर तोफ
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गोव्यात विदेशी पर्यटकांवर अत्याचार होण्याच्या प्रकारांबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना वेळोवेळी जाणीव करून दिली आहे. पण आपल्या सूचनांकडे पद्धतशीरपणे कानाडोळा करणेच त्यांनी पसंत केले. गेल्या डिसेंबर महिन्यात याप्रकरणी मुख्यमंत्री कामत यांना खास पत्र पाठवून या प्रकारांची गंभीर दखल घेण्याची विनंती केली, पण त्यालाही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. हे प्रकार असेच चालू राहणार असतील तर त्याचे गंभीर परिणाम गोव्याला भोगावे लागणार आहेत व गोवा हे एक सुरक्षित व शांत पर्यटनस्थळ म्हणून लाभलेले लौकिक धुळीस मिळेल, असा इशारा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी दिला.
आज इथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते जबाब देत होते. केवळ गोव्याला बदनाम करण्यासाठीच हे प्रकार सुरू आहेत असे म्हणून हात झटकता येणार नाही तर गृहखात्याने या प्रकरणांचा बिमोड करणे गरजेचे आहे. हरमल येथील या प्रकाराबाबत मुख्यमंत्री काहीही वक्तव्य करू पाहत नाही,असे काही पत्रकारांनी विचारले असता त्याचे उत्तर तेच योग्य पद्धतीने देऊ शकतील,असे मिकी म्हणाले. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे किंवा नाही याचे उत्तर जनताच देऊ शकते त्यामुळे हे खाते सांभाळण्यास कोण पात्र किंवा कोण अपात्र हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.
अलीकडच्या काळात या प्रकारांत वाढ होत आहे व त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी सुरू आहे. आता ही बदनामी थांबवणे ही संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे. केवळ पर्यटनमंत्री या नात्याने आपण यात काहीही करू शकत नाही, असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. प्रत्येक घटनेवेळी विदेशी देशातील दूतावासाकडून गोव्यात न जाण्याचा फतवा काढला जातो व त्याचा फटका एकंदरीत राज्याच्या पर्यटन उद्योगावरही होतो. पर्यटन हा राज्याचा आर्थिक कणा आहे हे अजिबात विसरता येणार नाही व त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल. आता या गोष्टीचा सारासार विचार करणेच गोव्याच्या हिताचे ठरेल,असेही पर्यटनमंत्र्यांनी स्पष्ट केले.
येत्या ३० रोजी होणाऱ्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते गोव्यात येतील. त्यांच्यासमोर हा विषय चर्चेस येणार आहे व त्या दृष्टीने या संपूर्ण परिस्थितीचा आढावाच घेतला जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

No comments: