Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 January, 2010

मज्जाव केल्यानंतरही आगोंदमध्ये हिंदू जनजागृती समितीची सभा

सभागृहास सशस्त्र पोलिसांचा गराडा

काणकोण, दि. २४ (प्रतिनिधी) - आगोंदमध्ये गेले आठ दिवस श्रीरंजनी पाईक देवालयाच्या सभागृहात सभा घेण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच चालली होती, असे स्पष्ट करूनही सशस्त्र पोलिसांनी आज हिंदू जनजागृतीतर्फे आयोजित सभा घेण्यास मज्जाव केला. पंचायत व संबंधितांकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय सभा घेऊ दिली जाणार नाही,अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने, पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या दडपशाहीचे स्मरण झाले,अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. अशा प्रकारे हिंदूंची सभा अडविण्याच्या या प्रकारामुळे काणकोण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी केवळ प्रचारासाठीच होती, असे पोलिस निरीक्षक सुरज हर्ळणकर यांनी पत्रकारांना सांगितले.
ग्रामीण विकास यंत्रणेने बांधलेल्या मंदिर सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्यात आल्याने उपस्थितांनी ही सभा रस्त्याजवळ असलेल्या एका वडाच्या झाडाखाली घेतली. यावेळी मराप्रसचे अध्यक्ष रमेश नाईक, समितीचे प्रमख जयेश थळी, रणरागिणीच्या प्रमुख शोभा सावंत व स्थानिक कार्यकर्ते दयानंद फळदेसाई, ज्येष्ठ नागरिक महाबळेश्वर फळदेसाई, सदानंद देसाई, तालुका स्वयंसेवा गटाच्या अध्यक्ष छाया पै खोत, शिवसेनेच्या मिलन देसाई व अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
राज्यात चाललेले गैरप्रकार, जुगार, मटका, कॅसिनो सरकारच्या आशीर्वादाने चालतात, मात्र हिंदूंची धार्मिक सभा परवानगी नाकारून बंद पाडण्यात येते, हा केवळ जनतेचा,आमदारांचा नव्हे तर समस्त हिंदू समाजाचा अपमान असून या अपमानाचा सूड घेण्यासाठी राज्य सरकार नेस्तनाबूत करणे स्वाभिमान्यांचे कर्तव्य ठरते,असे रमेश नाईक यांनी सांगितले. भ्याड, पळपुटे राष्ट्र म्हणून आपली गणना जगात होत आहे, हिंदूंवरील अन्याय वाढत चालले आहेत, हे असेच चालू राहिल्यास संपूर्ण गोवाच पेटून उठेल,असा इशारा त्यांनी दिला.
मोती डोंगर तलवार प्रकरण, अफजल गुरू फाशी प्रकरण व दहशतवादी हल्ले यांच्याबाबत निष्क्रिय असलेले सरकार आज पोलिसांकरवी सभा बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, ही निव्वळ दडपशाही आहे,असे यावेळी फळदेसाई यांनी सांगितले.
देशभरात "लव्ह जिहाद'चा फतवा काढून कर्नाटकात ३० हजार, केरळमध्ये ४ हजार तर फोंडा शहरात ३० युवतींना मुस्लिमांनी अपहरण करून अथवा शादी करून नंतर अनैतिक मार्गाला लावल्याचा आरोप शोभा सावंत यांनी आपल्या घणाघाती भाषणात केला. हे सारे एका पाहणीत उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू जनजागृतीच्या देशात साडेचार हजार सभा झाल्या, गोव्यात चार मोठ्या तर १५ लहान सभा झाल्या, मात्र आता जनजागृतीमुळे हादरलेल्या सरकारने आज ही सभा सभागृहात घेण्यास मज्जाव केला, रस्त्यावर सभा घेणे भाग पाडले, तरीही स्वाभिमानी हिंदू हार मानणार नाहीत,असे जयेश थळी यांनी ठणकावून सांगितले.
सभागृहात सभा घेण्यास मनाई करण्याच्या आदेशाविरुद्ध निषेध व्यक्त करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
अपर्णा मराठे यांनी स्वागत केले, वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.

No comments: