Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 24 January, 2010

गोव्यातील दुचाकी चोरणारी टोळी वेंगुर्ले येथे पकडली

पेडणे दि. २३ (प्रतिनिधी): मांद्रे व हरमल भागातून चोरीला गेलेल्या मोटरसायकली वेंगुर्ले पोलिसांनी जप्त करताना वेंगुर्ले परिसरातील ६ जणांच्या टोळीला अटक करून तब्बल २९ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. त्यातील अधिकांश मोटरसायकली गोव्याच्या असल्याचे सांगण्यात आले.
१९ ते २४ वयोगटातील या टोळीतील युवक कॉलेजकुमार असल्याची माहिती मिळाली आहे. मांद्रे येथील युवा वकील ऍड. प्रसाद शहापूरकर यांची २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्री भगवती सप्तेश्वर मंदीरासमोर पार्क करून ठेवलेली; तर हरमल येथील कृष्णा साटेलकर यांची हरमल येथे पार्क करून ठेवलेली गाडी चोरीला गेली होती. त्याची तक्रार हरमल पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पेडण्याचे पोलिस निरीक्षकउत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर याप्रकरणी तपास करत होते. तथापि, आजपर्यंत त्या चोरीचा छडा लागला नव्हता.
वेंगुर्ले येथील प्रभारी पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा गुन्हा १४ रोजी रेडी येथील टाटा मेटॅलिक्स कपंनीसमोर घडला. तेथून हिरोहोंडा पॅशन गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्याच दिवशी दाखल झाली. हा तपास सुरू असताना फिर्यादीच्या एका ओळखीच्या माणसाने वेंगुर्ल्यातील एका गॅरेजमध्ये ती गाडी पाहिली आणि त्याने ती माहिती फिर्यादी शेलटे यांना कळवली व शेलटे यांनीही ताबडतोब सदर बाब वेंगुर्ले पोलिसांच्या निदर्शनाला आणली.
मात्र पोलिस त्या गॅरेजपर्यंत पोहोचण्यापूर्वी संबंधित गाडी मालकाने गाडी गॅरेजमधून नेली होती. यावरून पोलीसांनी गॅरेज मालकाला त्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता त्याने सागर पेडणेकर याचे नाव सांगितले. म्हणून पोलीसांनी सागर पेडणेकरशी संपर्क साधून गाडीबाबत विचारणा करताच पेडणेकरने वेंगुर्ले येथील युवकांकडून गाडी निम्म्या पैशात विकत घेतल्याचे सांगितले. यावेळी त्याने या युवकामधे गोपाळ उर्फ गोट्या नारायण माळकर (वय २०), राकेश भरत परब (वय२०), अनंत विठ्ठल घाटकर (वय २२) यांची नावे सांगताच तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसी हिसका दाखवताच आपण सदर गाडी चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
या चोरट्यांनी हॅंडल लॉक नसलेल्या गाड्या स्विच डायरेक्ट करून पळवल्याचे उघड झाले आहे. जत्रा, आठवडी बाजार, महोत्सव अशा मोक्याच्या जागी हेच तंत्र वापरून ते गाड्या पळवत होते, असे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. नंतर या दुचाकी ते १० ते १५ हजारांना रुपयांत विकत असत. विशेष म्हणजे अटकेत असलेल्या पाच जणांपैकी गोट्या व घाटकर हे बारावीत, तर
राकेश हा अकरावीत आहे. वेंगुर्ल्यातील दोघा नागरिकांनी या चोरट्यांकडून घेतलेल्या गाड्या पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधिकारी विवेकांनद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. जी. मोरे, हवालदार राजू उबाळे, एन्. व्ही. मोहिते, राजू जाधव , श्री. कांबळे, श्री. दळवी व संतोष जाधव यांनी ही कारवाई केली.
वाखारे यांनी सांगितले, यातील बहुतांश वाहने गोव्याच्या हद्दीत चोरल्याची शक्यता आहे. गोव्याचे मोटर रजिस्टर नंबर व बनावट नंबरप्लेट घालून वाहने विकली गेली. चोरलेली गाडी एखादा बकरा शोधून त्याला पटवायचे आणि गाडी फायनान्स् कंपनीने ओढून आणली असून अर्ध्या किमंतीत ते विकायचे. एका महीन्यानंतर कागदपत्रे देतो अशी बतावणी हे भामटे करायचे.
मात्र गाडी विकल्यानंतर ते ग्राहकाला तोंडही दाखवत नसत.
एकूण सहा आरोपींपैकी एक संशयित गॅरेजशी संबंधित, दुसरा ग्राहक मिळवण्यात पटाईत व तिसरा व्यवहार करण्यात पटाईत होता.
जप्त केलेल्या २९ दुचाकींपैकी हरमल व मांद्रे येथील दोन गाड्या २२ रोजी वेंगुर्ला पोलिस स्थानकात ओळख पटवण्यात आली आहे. त्यावेळी गोव्याच्या नंबरप्लेट असलेल्या अनेक वाहनांचा त्यात समावेश असल्याचे दिसून आले.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेंगुर्ले पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन तपास केला जाईल. त्यामुळे गोव्यात चोरीस गेलेल्या दुचाकींचा छडा लागू शकेल.

No comments: