Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 March, 2009

स्वयंनिर्भर शहर विविध राज्यांची गुंफण अजोड: डॉ. गुहा

आजचे व्याख्यातेः जेम लर्नर (ब्राझिलचे जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार)
पणजी, दि. २८(प्रतिनिधी): भारत हा विविधतेने नटलेला देश एकसंध असण्याबाबत आजपर्यंत अनेकांनी संशय व्यक्त केला असला तरी या देशाची अखंडता अजूनही शाबूत आहे. विविधतेतील एकता या अजोड मुद्यामुळेच भारत म्हणजे जगातील सर्वांत औत्सुक्यपूर्ण देश असल्याचेअसल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक तथा चरित्रकार पद्मविभूषण डॉ.रामचंद्र गुहा यांनी केले.
पणजी येथे कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात सुरू असलेल्या व्दितीय धर्मानंद कोसंबी "विचारांचा महोत्सव'व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना आज डॉ. गुहा यांनी "भारत हा जगातील सर्वांत औत्सुक्यपूर्ण देश का आहे'या विषयावर आपले विचार व्यक्त केले. अत्यंत ओघवत्या शैलीत व प्रभावी वक्तृत्वाने डॉ.गुहा यांनी कलामंदिरात उपस्थित भरगच्च श्रोतेवर्गांला भारावून टाकले. इतिहास संशोधनाबरोबर क्रिकेट खेळाबाबतच्या माहितीवरही डॉ.गुहा यांची हातोटी असल्याने त्यांनी आपल्या व्याख्यानात इतिहासाची क्रिकेटशी सांगड घालून आपला विषय अत्यंत सोप्या पद्धतीने श्रोत्यांसमोर मांडला.
ते म्हणाले, भारतासारखा वैविध्यपूर्ण एकही देश जगात नाहीे. निसर्ग, भाषा,जात,धर्म,संस्कृती आदी विविध पातळीवर या देशात विविधता आहे. तरीही भारत या नावाखाली या देशातील विविध राज्यांची गुंफण मात्र अजोड आहे. मुळातच कोणत्याही देशाची निर्मिती ही एकसूत्रीपणावर अवलंबून असते.समान भाषा,जात,धर्म आदींवर देशाची रचना असते. या गोष्टींना केवळ भारत हा एकमेव देश अपवाद आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक विदेशी राजकीय निरीक्षकांनी या देशाच्या अखंडत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, परंतु त्यांचे अंदाज फोल ठरले. लोकशाही जर खऱ्या अर्थाने कुठे नांदत असेल तर ती आपल्या देशात.
यामुळेच देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला. देशात भ्रष्टाचार,अत्याचार,अन्याय घडतो हे जरी खरे असले तरी याविरोधात आंदोलनेही इथे घडतात. दिल्लीत राजपथावरील जागेत विविध घटकांकडून काढण्यात येणारे मोर्चे,आंदोलने हीच मुळे मतस्वातंत्र्याची झलक असल्याचे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.आपला देश हा सध्या एकाचवेळी चार क्रांतीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यात आर्थिक,मानवी वसाहत, राष्ट्रीय व लोकशाहीचा समावेश असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान,यावेळी पलवनकर पालू या एका दलित क्रिकेट गोलंदाजाकडून महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात समझोता घडवून आणण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली याचा किस्साही त्यांनी कथन केला. एकीकडे देशाचा स्वतंत्र लढा तर दुसरीकडे सामाजिक क्रांती याची माहिती देताना पलवानकर पालू या क्रिकेट खेळाडूच्या चरित्राचा आधार त्यांनी घेतला. देशाच्या विविधतेला आव्हान देत या देशाला एका सूत्रांत बांधण्याचे प्रयत्न करणारेच या देशाचे खरे शत्रू असल्याचेही ते म्हणाले.

No comments: