Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 March, 2009

पाक नौदल प्रमुखांची कसाबप्रकरणी कोलांटी

इस्लमाबाद, दि. २८ : मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून समुद्रमार्गे गेलेच नव्हते, असा छातीठोक दावा करणारे पाकिस्तानचे नौदल प्रमुख नौमान बशीर यांचे थोबाड फुटले आहे. आपला कालचा दावा मागे घेण्याची पाळी त्यांच्यावर आली असून, ९ अतिरेकी समुद्रमार्गेच कराचीहून मुंबईला गेल्याचा पाक गृहखात्याचा अहवाल योग्य असल्याचे बशीर यांना आज जाहीर करावे लागले.
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पहिल्या दिवसापासून पाक सरकारच्या विविध यंत्रणांनी परस्परउलट दावे करुन संभ्रमाची स्थिती निर्माण केली आहे. पाकच्या गृहखात्याच्या अहवालातील निष्कर्ष धाब्यावर बसवत, अतिरेकी समुद्रमार्गाने गेल्याचे पुरावेच नाहीत, असा नवा दावा बशीर यांनी केला होता. तथापि, २४ तास उलटण्याच्या आतच त्यांना आपले शब्द गिळावे लागले. त्यांनी काल केलेले वक्तव्य मागे घेतले असून, पाक गृहखात्याचा अहवाल योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
२६ नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या तपासात नौदलाचा थेट समावेश नव्हता. त्यामुळे गृह खात्याने जो अहवाल दिलेला आहे, तोच योग्य आहे. त्यांच्याकडे जास्त माहिती आणि पुरावे आहेत, असा खुलासा बशीर यांनी आज केला.
पाकने भारताला सादर केलेल्या पुराव्यांमध्ये २६ नोव्हेंबर हल्ल्याचा कट पाकच्या भूमीत शिजल्याचे पाक सरकारने मान्य केले होते. पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी १२ फेब्रुवारीला तसे जाहीर केले होते. त्यावेळी अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईला पोहोचल्याची कबुली त्यांनी दिली होती. परंतु त्यांच्याच अखत्यारीतील नौदलाने मात्र ते विधान काल खोडून काढले. आता पुन्हा कोलांटी मारत नौदल प्रमुखांनी नवा खुलासा केला आहे.

2 comments:

Anonymous said...

These Paki guys have no integrity, why give importance to their statements in the first place.

Anonymous said...

Exactly, just ignore them. But Indian govt. seems to be hell bent on extracting truth from these morons.