Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 21 May, 2008

ब्रॉडबॅंडचा 'बॅंड';'युटीएल'ला हाकलण्यामागे वास्तवातील कारण 'वेगळे'च

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोव्यात "ब्रॉडबॅंड' सेवेचे महत्त्व व व्यवसाय ओळखून देशातील एका नामवंत खाजगी टेलिफोन कंपनीने सरकारातील एका बड्या नेत्याकडे प्रस्ताव ठेवल्यानेच सध्या कार्यरत असलेल्या "युटीएल' कंपनीचे कंत्राट रद्द करण्यासाठी सरकारकडून आटापिटा सुरू आहे, असा गौप्यस्फोट या कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याने केला आहे.
माहिती व तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर यांनी सुरू केलेल्या "ब्रॉडबॅण्ड' सेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. तथापि, आता हे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले नसल्याचे निमित्त पुढे करून या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सदर अधिकाऱ्याने दिली. यासंबंधात सरकारने कंपनीला नोटिसा जारी केली असली तरी हे कारण केवळ निमित्त मात्र असून यामागे कोणाचा तरी स्वार्थ लपला असल्याचा आरोप सदर अधिकाऱ्याने केल्याने खळबळ माजली आहे.
आतापर्यंत या सेवेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले नाही हे खरे असले तरी त्याची कारणे काय, याचा सरकारनेच शोध घ्यावा, असे सांगण्यात आले. काही भागांत सरकारी खात्यांकडून खोदकाम किंवा इतर संबंधित कामांबाबत परवानगी मिळू न शकल्याने हे काम रखडल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. या कंपनीला लागू केलेला न्याय सरकारने अन्य प्रकल्पांनाही जारी करावा, नियोजित वेळेत काम पूर्ण न झालेली सर्व कंत्राटे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास सध्याचे ९० टक्के प्रकल्प रद्द करावे लागतील,असा टोलाही सदर अधिकाऱ्याने हाणला. एका बड्या कंपनीकडून आलेल्या प्रस्तावामुळेच आमच्या कंपनीला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. त्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली.

No comments: