अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा उद्या पर्वरीत मेळावा
पणजी, दि. 23 (प्रतिनिधी) ः "मराठा तितुका मेळवावा' या धर्तीवर अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी समाजातर्फे येत्या 25 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता पर्वरी येथील छत्रपती शिवाजी मंदिरात "संपर्क मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या विविध सुचनांचा पुढील उपक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे समाजाबद्दल आस्था असलेल्या मंडळींनी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई यांनी केला आहे. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष डॉ. उल्हास परब, सचिव सुभाष फळदेसाई व खजिनदार अरविंद देसाई उपस्थित होते.
गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे गोव्यातील प्रमाण 20 टक्के आहे. तथापि, हा समाज पुरेसा संघटित नाही. त्यामुळे त्याचे अस्तित्व फारसे जाणवत नाही. गोवा मुक्तीपूर्वीपासून या समाजाच्या संस्थेने शिक्षणप्रसाराचे बहुमूल्य कार्य केले आहे. मुक्तीनंतर सर्व समाजातील आणि इतर धर्मांतील शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली होती. आज ती गरज नसली तरी वेगळ्या प्रकारे समाजाला मदतीचा हात देण्याची, मार्गदर्शनाची गरज आहे हे लक्षात घेऊन समाज संस्थेने आपल्या कार्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वास्तूच्या उभारणीनिमित्ताने सर्व समाज आणखी संघटित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली. यासाठी लागणारा निधी समाजबांधवाकडून गोळा केला जाणार जाणार आहे. त्यासाठी खास योजना आखण्यात आली आहे. प्रत्येकाकडून निधी जमा करून पाच हजारपेक्षा जास्त रक्कम देणाऱ्याचे पैसे तीन ते पाच वर्षांत 5 टक्के व्याजाने परत केले जाणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
तसेच संभाव्य संकुलाची 60 टक्के जागा व्यावसायिक उपयोगासाठी आणून उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. बाकीची 40 टक्के जागा समाजाच्या उपयोगासाठी वापरली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.सहा कोटींचे भव्य संकुल
गोमंतक क्षत्रिय समाजाने सुमारे 6 कोटी रुपये खर्च करून भव्य इमारत उभारण्याचा संकल्प सोडला आहे. या इमारतीत एक हजारापेक्षा जास्त प्रेक्षक बसू शकतील असे वातानुकूलित सभागृह (मराठा संकुल) दुसऱ्या मजल्यावर असेल. तळमजल्यावर संस्थेच्या कार्यालयासाठी तरतूद करण्याबरोबरच वधू वर सूचक केंद्र, व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचीही सोय असेल. त्याचप्रमाणे दोन तळमजले उभारले जाणार आहेत. तेथे दीडशे वाहने ठेवण्याएवढी जागा असेल, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष संतोबा देसाई यांनी दिली.
Saturday 24 May, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment