Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 24 May, 2008

राजस्थानात गुज्जरांचे आंदोलन

गोळीबारात दहा ठार, रेल्वेमार्ग अडवला
बयाणा, दि. 23 ः बॉम्बस्फोट मालिकेने हादरलेल्या राजस्थानात आज (शुक्रवारी) पुन्हा गुज्जर समाजासाठी आरक्षणाच्या मुद्यावरून भडका उडाला. अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुज्जर लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेला गोळीबार आणि उडालेल्या संघर्षात एका पोलिसासह किमान आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या आंदोलनाचे लोण पसरू नये यासाठी केंद्र सरकारने उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांमध्ये सावधतेचा इशारा दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला रेल्वे रूळावर झोकून दिल्याने मुंबई-दिल्ली या दरम्यान एकही गाडी जाऊ शकली नाही.
गुज्जर आरक्षण संघर्ष समिनीच्या आवाहनावरून भरतपूर जिल्ह्यातील बयाणा येथे गुज्जरांनी आज रेल रोको आंदोलन केले. हे आंदोलन इतके तीव्र होते की, आंदोलनाच्या काळात मुंबई-दिल्ली मार्गावरून एकही रेल्वे गाडी धावू शकली नव्हती. आंदोलकांनी हा मार्गच अडवून धरला होता. याशिवाय, धुमारिया आणि कारवार रेल्वे स्थानकादरम्यानचा रूळही उखडून फेकण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूकही काही काळ ठप्प होती. पोलिसांचा लाठीमार आणि अश्रुधूराचा माराही त्यांना पांगवू शकला नाही.
गेल्या वर्षी याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनुसूचित जमातीच्या दर्जाची मागणी करणाऱ्या गुज्जरांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. यात 26 जणांचे बळी गेले होते. या घटनेच्या स्मृती ताज्या करताना गुज्जर समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. पाहता-पाहता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. येथून जवळच असणाऱ्या डुमरिया रेल्वे स्थानक परिसरात पोलिस आणि गुज्जर समोरासमोर आले. त्यांना थोपवून धरण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमाराचा वापर केला. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. संघर्ष विकोपाला गेला. पोलिसांच्या अनेक गाड्या आगीच्या हवाली करून दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. गोळीबार आणि दगडफेकीत सात आंदोलक आणि एक पोलिस ठार झाला असून, अनेकजण जखमी आहेत. जखमींमध्ये पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे.
हिंसाचारात ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा पाच असा सांगण्यात येत असला तरी तो जास्त असल्याचे समजते. या हिंसाचारात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यात किमान 12 ते 15 लोक ठार झल्याचा दावा गुज्जर नेते किरोडी सिंह बैंसला यांनी केला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रल्हादसिंह गुजल आणि अतरसिंह भडाना या गुज्जर नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
या स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केल्या असून लष्कराला सज्ज राहण्यास सांगितले आहे. या घटनेची केंद्र सरकारनेेही गांभीर्याने दखल घेतली आहे. अन्य राज्यांपर्यंत याचे लोण पोहोचू नये, यासाठी केंद्राने उत्तरप्रदेश, दिल्ली आणि हरयाणा या शेजारील राज्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकार हतबल
गुज्जरांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी मागील वर्षी मे, जून आणि ऑक्टोबरमध्ये देशव्यापी आंदोलन झाले होते. त्यात 30 हून अधिक लोक ठार झाले होते. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गुज्जर नेत्यांशी चर्चा करून हा वाद थोपवून धरला होता. तसेच केंद्राकडे याविषयीची शिफारसही पाठविली होती. पण, केंद्राने गुज्जरांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यास असमर्थता दर्शविली होती.

No comments: