Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 April, 2008

महागाईविरुद्ध अडवाणी कडाडले

इंदूर, दि.१४ : सर्वसामान्यांच्या हितांचे रक्षण करण्याची ग्वाही देणाऱ्या संपुआने सत्तेवर येताच आपला खरा चेहरा दाखविला आहे. महागाई नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन या सरकारने संसदेला आणि नागरिकांना वारंवार दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतानाही या सरकारने आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही, अशी परखड टीका करताना, "आजवर आश्वासने फार झालीत, आता महागाई कमी होईल अशी कृती करा,' असे आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी संपुआ सरकारला दिले.
सरकारने विविध उपाय करूनही महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. हे या सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे. चार वर्षांच्या सत्ताकाळात हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यात, संसदेला दिलेली आश्वासने पाळण्यात, संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी मोहंमद अफजल गुरूला फाशी देण्यात आणि दहशतवाद मोडित काढण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आता तर चटके देणाऱ्या महागाईपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्याची क्षमताही या सरकारमध्ये राहिली नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला याबाबत खडसावून जाब मागण्यात येईल, असे अडवाणी यांनी सांगितले.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला किती भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे याची जाणीवदेखील या सरकारला झाली नसल्याचे महागाईच्या सततच्या वाढत्या आलेखावरून स्पष्ट होते.जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत, असे सांगताना अडवाणी म्हणाले, केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार सत्तेवर असतानाही चलन फुगवट्याचा तांत्रिक आकडा वाढला होता. पण, त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र स्थिर ठेवण्यात वाजपेयी सरकार यशस्वी ठरले होते. महागाईची साधी झळदेखील सामान्यांना बसू दिली नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या महू शहरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सरकारकडून आम्हाला श्वेतपत्रिकेची अपेक्षा आहे. ती त्यांनी काढायलाच हवी. असे केले नाही तर एक दिवसही कामकाज होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

No comments: