Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 April, 2008

गुजरतमध्ये कालव्यात बस कोसळून ४६ ठार

मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी
वडोदरा, दि.१६ : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील बोडेली नामक गावातील नर्मदा नदीच्या ६० फूट खोल कालव्यात आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाची एक प्रवासी बस कोसळली. या भीषण अपघातात एकूण ४६ जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये बहुतांश शाळकरी बालकांचाच समावेश आहे. या बसमधून ते शाळेत जात होते. या घटनेवर राज्याचे राज्यपाल नवलकिशोर शर्मा व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून चौकशीसाठी त्रिदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. अपघातामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
""अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ६२ प्रवासी होते. पैकी ४ जणांना वाचविण्यात आलेले आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून आतापर्यंत एकूण ४६ मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. यामध्ये बहुतांश शाळकरी बालकेच आहेत,''अशी माहिती जिल्हाधिकारी विजय नेहरा यांनी दिली.
""अपघातग्रस्त बस ही गुजरात राज्य परिवहन महामंडळाची होती. तारगोलवरून ही बस बोडेलीच्या दिशेने जात असताना आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास बसवरून चालकाचे नियंत्रण सुटले व बस पुलावरून कोसळून ६० फूट खोल असलेल्या नर्मदा नदीच्या कालव्यात पडली. वडोदरापासून ६० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. घटनेचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताबडतोब बचाव मोहीम उघडण्यात आली. कालव्यातील पाण्याची पातळी जास्त असल्याने बस पाण्यात बुडाली व अनेकांना जलसमाधी मिळाली. सरदार सरोवर धरणातून या कालव्यात पाणी सोडण्यात येते. बचाव मोहीम सुरू केल्यानंतर कालव्यात पाणी सोडणे थांबविण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने बस कालव्याबाहेर काढण्यात आलेली आहे, असे नेहरा यांनी सांगितले.
मृत्युमुखी पडलेल्या ४६ जणांचे देह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली आहे, असेही नेहरा यांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशी होणार
या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून त्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. दोन शासकीय सचिव आणि एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा या चौकशी समितीत समावेश आहे. ही समिती अपघाताची सर्वांगाने चौकशी करणार आहे व आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपविणार आहे.

No comments: