कानपूर, दि. १३ : भज्जीने दक्षिण आफ्रिकेचे बल्ले बल्ले केले. आणि वीरू, ईशांत, श्रीशांत यांनी पाहुण्यांच्या फलंदाजीला भगदाड पाडले. त्यामुळे पाहुणा संघ ग्रीनपार्कवर दुसऱ्या डावात उण्यापुऱ्या १२१ धावांत गारद झाला! मग विजयासाठी आवश्यक असलेल्या ६२ धावा यजमानांनी केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात कुटल्या आणि प्रेक्षकांनी सारे स्टेडियम टीम इंडियाचा जयघोष करत डोक्यावर घेतले... त्याचबरोबर मालिकेत १ - १ अशी फिट्टंफाट झाली.
या लढतीत पहिल्या दिवशी जेव्हा पाहुण्यांचा पहिला डाव २६५ धावांत आटोपला तेव्हाच काहीतरी वेगळे घडणार, अशी चिन्हे दिसू लागली होती. घडलेही तसेच. एरवीदेखील या खेळपट्टी फिरकी गोलंदाजांवर फिदा असायची. हा लौकिक तिने आजही कायम राखला. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड झाला तोसुद्धा रामनवमीच्या पवित्र दिनी. दुसऱ्या डावात भज्जीने चार, वीरूने तीन, ईशांतने दोन व श्रीशांतने एक बळी घेऊन पाहुण्यांच्या गोटात "शांतता' निर्माण केली. मग उरलेली कामगिरी वीरू आणि या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत असलेल्या वासिम जाफर यांच्या मोबदल्यात "दादा' सौरभ गांगुली व "जॅमी' राहुल द्रविड यांनी पूर्ण केली.
त्यानंतर गोव्यासह देशाच्या विविध भागांतून "टीम इंडिया'वर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सतत चोवीस तास लोकांना कोणते कार्यक्रम दाखवावेत, या विवंचनेत असलेल्या चॅनेलवाल्यांना तर त्यामुळे चांगले "खाद्य' मिळाले. रात्रभर जवळपास प्रत्येक चॅनेलवर या विषयाचे अक्षरशः त्यामुळे भुस्कट पाडण्यात आले. परिणामी लोकांना (निदान काही काळ तरी) वाढत्या महागाईचा विसर पडला. कारण या देशात क्रिकेट हा धर्म मानला जातो!
Monday 14 April, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment