Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 April, 2008

क्रिकेट तिकीट घोटाळा प्रकरण

नार्वेकरांह इतरांचे फेरविचार अर्ज
सत्र न्यायालयाने फेटाळले

मडगाव, दि. 17 (प्रतिनिधी): देशभरात गाजलेल्या क्रिकेट तिकिट घोटाळा प्रकरणी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर व इतरांनी आरोप निश्चितीविरोधात दाखल केलेले फेरविचार अर्ज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप के. गायकवाड यांनी आज (गुरुवारी) फेटाळून लावले.
मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऍश्ले नोरोन्हा यांनी नार्वेकर, रामनाथ शंकरदास, विनोद फडके, चिन्मय फळारी, देवदत्त फळारी, व्यंकटेश राऊत देसाई, ज्योकिम पिरिस, गंगाराम भिसे व एकनाथ नाईक यांच्यावर 4 एप्रिल 2007 रोजी या प्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. त्याला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
6 जानेवारी 2001 रोजी फातोर्डे येथील नेहरू स्टेडियमवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवशीय आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. त्या सामन्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सोडून लोकांच्या जीवाशी खेळ केला आणि बनवाट तिकिटे छापून लाखो रुपयांचा घोटाळा केला असे आरोप गोवा क्रिकेट असोसिएशनचे तेव्हाचे अध्यक्ष नार्वेकर यांच्यासह एकूण नऊ आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध सकृत दर्शनी पुरावे असल्याचे सांगून न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. तथापि, कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला नऊपैकी सहा आरोपींनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
सत्र न्यायालयात आरोपींतर्फे ऍड. रोहित डिसा, अरुण डिसा यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी वकील सुभाष देसाई यांनी प्रभावीरीत्या सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यावर न्या. श्री. गायकवाड यांनी आरोपींविरुद्ध सकृत दर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून फेरविचार अर्ज निकालात काढले.

No comments: