Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 April, 2008

महागाई कशी रोखावी?

आज मंत्रिमंडळाची खास बैठक
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): उद्या (१६) रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाईच्या विषयावरून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार नक्की काय भूमिका घेते, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. महागाईवरच चर्चेसाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही बैठक बोलावली असून नागरी पुरवठा खात्याअंतर्गत सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कामत यांनी आपले सरकार "आम आदमी'चे असल्याचे घोषित केल्यानंतर आता अचानकपणे महागाईने धारण केलेल्या रुद्रावतारामुळे हा नारा हवेतच विरल्यासारखी स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थिती पाहता सामान्य लोकांना आपल्या जखमेवर सरकारकडून मीठ चोळल्यासारखे वाटू लागल्याने नेत्यांसाठी ती अडचण ठरली आहे. नागरी पुरवठा खात्याअंतर्गत लोकांना कमी दरात साखर, तांदूळ,गहू व तेल देण्यासाठीचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळाली आहे. साखर १०.५० रुपये प्रतिकिलो दराने देण्याचा विचार आहे, परंतु एका रेशनकार्डवर केवळ एक किलोच साखर देण्याचे सरकारने ठरवल्याचे समजते. कार्डधारकांना अनुदानित दरात तेल उपलब्ध करून देण्याचाही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात जेवणात तांदळाचा वापर होतो. राज्यात सध्या तांदळाची गरज सुमारे ३ हजार मेट्रिक टन असून केंद्राकडून फक्त ८९६ मेट्रिक टन तांदूळ येतात त्यामुळे अधिकच पंचाईत झाली आहे. एकतर मार्केटिंग फेडरेशन किंवा खुल्या बाजारातून तांदूळ विकत घेऊन रेशनकार्ड धारकांना वितरित करण्याचाही प्रस्ताव सरकारसमोर निर्णयासाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यात गव्हाची गरज दीड हजार मेट्रिक टन आहे. गोव्याला फक्त २०१ मेट्रिक टन गहू मिळतो, अशी स्थिती असताना नागरी पुरवठा खाते सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय ठरल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. सरकार आता याप्रकरणी नक्की कोणता तोडगा काढते त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. महागाई हा जागतिक प्रश्न असल्याची भाषणे कॉंग्रेसकडून ठोकली जात असताना विरोधी भाजपने मात्र या संधीचा वापर करून महागाईविरोधी आंदोलन निर्धारपूर्वक चालवल्याने सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.

No comments: