Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 February, 2008

समता, न्याय व लोकशाहीच्या
बळावरच विश्र्वशांती ः उपराष्ट्रपती

पणजी, दि. 4 (प्रतिनिधी)ः समता, न्याय व लोकशाहीच्या बळावरच विश्वशांती प्रस्थापित होणे शक्य आहे, असे उद्गार उपराष्ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांनी काढले.
राज्य कला व सांस्कृतिक संचालनालय व कै. दामोदर धर्मांनंद कोसंबी शताब्दी स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "विचार उत्सव" व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल एस. सी. जमीर, मुख्यमंत्री दिगंबर कामत, कै. कोसंबी यांच्या कन्या डॉ. मीरा कोसंबी, शताब्दी महोत्सवाच्या अध्यक्ष डॉ. मारीया अरोरा कुतो आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. अन्सारी पुढे म्हणाले की, समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कै. दामोदर कोसंबी हे एक धडपडणारे क्रियाशील योद्धे होते. ""विश्वशांतीसाठी खऱ्या लोकशाहीची गरज असते व या लोकशाहीत कोणा एकाचे वर्चस्व न राहता सर्व समान असावे लागतील"" या विचारधारेने त्यांनी काम केले. इतिहासकार बाशम यांनी त्यांच्या मृत्युसमयी लिहिलेल्या श्रद्धांजली संदेशात "पुरातन भारत, गणितशास्त्र व शांततेचे रक्षण या तीन गोष्टींसाठी कै.कोसंबी यांनी प्रामाणिकपणे काम केले" अशा शब्दांत त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. समाजात उद्भवणाऱ्या तंट्यांवर तिथल्यातिथे तोडगा काढून शांतता अबाधित ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी विशेष अभ्यास चालवला होता. चांगुलपणामुळेच समाजात शांतता स्थापन करण्यास वाव असल्याची त्यांची मनोधारणा होती, असेही श्री. अन्सारी म्हणाले. देशाचे भविष्य ठरवण्यासाठी आत्ताच योग्य कृती करण्याची आवश्यकता आहे ती भविष्यात करता येणार नाही, असे सल्ला देत जगासमोरील अनेक ज्वलंत प्रश्नांवर श्री. अन्सारी यांनी प्रकाश टाकला. वाढत्या स्पर्धात्मक व व्यापार उद्योगाच्या रस्सीखेचीत देशांतर्गत रुंदावत जाणारी दरी व त्यात असमानतेच्या भावनेमुळे हिंसात्मकतेत झालेली वाढ हीच विश्वशांतीसमोरील सर्वांत मोठी अडचण ठरल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आपल्या भाषणात कै. कोसंबी यांच्यासारख्या महान व्यक्तीची आठवण करून ही व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. यावेळी उपराष्ट्रपतिपदाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात आलेल्या श्री. अन्सारी यांना गोव्याचे वैशिष्ट्य सांगताना या भूमीवर पाय ठेवलेला माणूस आपोआपच येथे रुळतो व इथला बनतो, अशी स्तुती श्री. जमीर यांनी केली.
डॉ. मीरा कोसंबी यांनी कै. दामोदर कोसंबी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या स्मृतीने पुणे येथेही दर महिन्याला एक सार्वजनिक व्याख्यान आयोजित केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. श्रीमती कुतो यांनी आयोजन समितीच्या स्थापनेचा उद्देश विशद केला. यावेळी उपराष्ट्रपती, डॉ. मीरा कोसंबी यांना राज्याच्या वतीने समई प्रदान करण्यात आली. शेवटी कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी आभार मानले.पाठ्यपुस्तकात धडे
कै. कोसंबी यांच्यासारखे विद्वान या गोमंतभूमीत जन्मले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे विचार नव्या पिढीसमोर येण्यासाठी पाठ्यपुस्तकांत त्यांचे धडे घालण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्र्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले. कै.कोसंबी यांची वर्धा येथील समाधी अत्यंत दुर्लक्षीत स्थितीत असून या समाधीचे नूतनीकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यासाठी लवकरच गोव्यातून एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक वर्धा येथे पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

No comments: