Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 February, 2008

वेगनियंत्रक रद्द न केल्यास
15 पासून बस वाहतूक बंद

बस मालक संघटनेचा इशारा
पणजी, दि. 4 (प्रतिनिधी)ः येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत सरकारने लागू केलेले "वेगनियंत्रक' रद्द न केल्यास राज्यातील संपूर्ण बस वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा आज अखिल गोवा बस मालक संघटनेने दिला.
त्याचप्रमाणे वेग नियंत्रक न बसवल्याने वाहतूक खात्याने 1 फेब्रुवारी पासून बंद ठेवण्यात आलेल्या बसेसना त्वरित परवाने देण्याचा मागणी करून यावेळी तसा ठराव घेण्यात आला. आज सकाळी पणजी येथे आयोजित केलेल्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी सुमारे 50 पेक्षा जास्त बसमालक या बैठकीला उपस्थित होते.
कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना हा नियम का लागू करण्यात आला नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. बस, ट्रक यांच्या अतिवेगामुळे राज्यात किती अपघात झाले आहेत, ते सरकारने आधी उघड करावे, असे थेट आव्हान यावेळी सरकारला देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक, उपाध्यक्ष रॉनी फर्नांडिस, उत्तर गोवा अध्यक्ष पांडुरंग रामा नाईक, ओलाव ब्रागांझा व सुदेश कळंगुटकर उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक म्हणाले की, आमचा व्यवसायच रस्त्यावरचा आहे. आम्ही सरकारला जास्त कर देतो. तरीही सरकारतर्फे आमचीच जास्त सतावणूक केली जाते. वेग नियंत्रक नियम लागू करण्यापूर्वी सरकारने आम्हाला विश्वासत घेतले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. वेग नियंत्रक यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे 16 हजार रुपये खर्च येतो. एका महिन्यात तो मोडल्यास दुसऱ्यावेळी ही यंत्रणा बसवायला परवडणारे नसल्याचे श्री. नाईक म्हणाले. त्याचप्रमाणे ही यंत्रणा बसवल्यानंतर त्या ठिकाणी रस्ता वाहतूक अधिकारी "सील' ठोकणार आहे. ते "सील' काढण्यासाठी अधिकाऱ्याची परवानगी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या वेळी एखादी बस "गिअर बॉक्स' मोडल्याने बंद पडल्यास तीन दिवस बंद ठेवावी लागणार असल्याचे ते म्हणाले. शनिवार व रविवारच्या दिवशी वाहतूक कार्यालयाला सुट्टी असल्याने कोणीही अधिकारी उपलब्ध होणार नसल्याची अडचण त्यांनी यावेळी मांडली.
गोव्यात रस्त्यावर फिरणाऱ्या मंत्र्यांच्या आलिशान गाड्या, पल्सर मोटारसायकली यांवर आधी नियंत्रण ठेवा. पोलिसांनी तालांव देण्यापेक्षा या वाहनांच्या वेगमर्यादेवर लक्ष केंद्रित केल्यास अपघातांची संख्या कमी होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दोन बसेसमध्ये स्पर्धा लागण्यास वाहतूकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवीन बसला परवाना देऊ नये असा अहवाल दिलेला असताना उपजिल्हाधिकारी व मंत्री नवीन परवाने देत असल्याचा थेट आरोप यावेळी करण्यात आला. फक्त पाच मिनिटांच्या अवधीत दोन बसेस सुटत असल्याने त्यांच्यात ही जीवघेणी स्पर्धा लागत असल्याचे यावेळी श्री. नाईक म्हणाले.

No comments: