Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 July, 2011

राणे पितापुत्रांना भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडा

माध्यमप्रश्‍नी वाळपईत प्रा. वेलिंगकरांचे आवाहन
वाळपई, दि. ११ (प्रतिनिधी): आपण कसेही वागलो तरी जनता आपल्याच मागे राहणार अशा भ्रमात काही नेते वागत आहेत. या नेत्यांची मुजोरी जिरवणे अत्यंत आवश्यक आहे. सत्तरीतील राणे पिता-पुत्रांनी आजवर माध्यमप्रश्‍नी ‘नरो वा कुंजरोवा’ अशीच भूमिका घेतली आहे. सत्तरीतील जनतेने राजकीय हितसंबंध बाजूला सारून भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच योग्य कृती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आज वाळपईतील भाषाप्रेमींच्या बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर भाषा सुरक्षा समितीचे सत्तरी तालुका अध्यक्ष रणजीत राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, वल्लभ केळकर, आनंद शिरोडकर, ऍड. शिवाजी देसाई यांची उपस्थिती होती.
मातृभाषेबरोबरच आपल्या संस्कृतीचा गळा घोटण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिगंबर कामत सरकारला रोखण्यासाठी संपूर्ण गोवा पेटून उठला असताना अजूनही काही नेते दुतोंडी भाषा करत आहेत. सरकारमध्ये राहून ते एका बाजूने सरकारला खूष करीत आहेत, तर दुसर्‍या बाजूने मातृभाषेच्या समर्थनार्थ बोलण्याचे नाटक करत आहेत. लोकांना गृहीत धरत असलेल्या या दुतोंडी नेत्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे. आपल्याला कोणत्याही स्थितीत हा लढा जिंकायचा असून विजयी मानसिकता घेऊनच पुढे जायचे आहे. आज आपण मागे पडलो तर भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही असेही प्रा. वेलिंगकर म्हणाले.
यावेळी रणजीत राणे म्हणाले की, काही नेते केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी आम आदमीला लाचार बनविण्याचे हीन कृत्य करीत असून अशा वृत्तीपासून आज युवा पिढीने सावध राहायला हवे. येत्या २४ जुलै रोजीची सभा यशस्वी करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
२४ जुलै रोजी होणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत पातळीवर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठका १५ जुलैपर्यंत पूर्ण करून घरोघरी हा विषय पोहोचविण्याचे ठरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक ऍड. शिवाजी देसाई यांनी केले तर रणजीत राणे यांनी आभार मानले.

No comments: