Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 11 July, 2011

जनताच धडा शिकवेल

फ्रान्सिस डिसोझा यांचा खणखणीत इशारा
सडा वास्कोत माध्यमप्रश्‍नी प्रचंड मोर्चा
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन


वास्को, दि. १० (प्रतिनिधी)
कुठल्याही समाजाला संपवायचे असल्यास त्या समाजाच्या संस्कृतीवर प्रथम हल्ला करावा याची जाणीव गोव्याच्या कॉंग्रेस सरकारला पूर्णपणे असल्याने त्यांनी माध्यम प्रश्‍नावरून कोकणी व मराठी भाषेवर हल्ला केलेला आहे. राज्याची भाषा हेच राज्याचे प्रथम व खरे अस्तित्व असून दिगंबर सरकारने कोकणी व मराठीवर केलेल्या आक्रमणाला योग्य धडा जनताच शिकवेल असा खणखणीत इशारा आज वास्कोत म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी दिला.
प्राथमिक भाषा माध्यम प्रश्‍नावरून गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून संपूर्ण गोव्यात आंदोलने छेडण्यात येत असून आज ‘सडा नागरिक कृती समितीने’ ह्या भागात सरकारच्या निर्णयाविरुद्ध भव्य असा मोर्चा काढला. सडा येथील सरकारी विद्यालयाकडून काढण्यात आलेल्या ह्या मोर्चात ह्या भागातील शेकडो वृद्ध, महिला, पुरुष तसेच विद्यार्थिवर्गाची उपस्थिती दिसून आली. ह्या मोर्चाच्या दरम्यान बनवण्यात आलेला गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याला फटकेही मारण्यात आले. ‘एक दोन तीन चार, मराठी, कोकणी भाषेचा जयजयकार’ अशा वेगवेगळ्या घोषणांनी काढण्यात आलेल्या भव्य अशा मोर्चाची शेवटी सडा येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरासमोर सांगता करण्यात आली. यानंतर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत म्हापसाचे आमदार श्री. डिसोझा यांच्याबरोबर मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, गोवा शिवसेना प्रमुख रमेश नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संजय सातार्डेकर, मुरगावचे माजी नगरसेवक तसेच ज्येष्ठ नागरिक रमाकांत रेवणकर, माजी नगरसेविका अर्चना कोचरेकर, उल्का गावस, श्रीकांत धारगळकर तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांशी बोलताना आमदार डिसोझा यांनी, माध्यम प्रश्‍नावरून सरकारने घेतलेला निर्णय गोव्याची संस्कृती पूर्णपणे मिटवण्याचा असल्याचे सांगून अशा प्रकारच्या अपराधाचा जनतेने निषेध करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकारकडून करण्यात येत असलेले विविध भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेत वाद निर्माण करून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचाही हा एक प्रयत्न असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. येणार्‍या काळात अशाच प्रकारे हे सरकार गोव्याचे अस्तित्व मिटवणार असून यंदाचे वर्ष गोव्याच्या इतिहासाचे सुवर्ण वर्ष असून आनंद साजरा करण्याऐवजी आपली भाषा वाचवण्यासाठी जनतेला रस्त्यावर येणे यासारखी लज्जास्पद गोष्ट आणखीन काय असेल असा सवालही श्री. डिसोझा यांनी केला. ह्या सरकारला खरोखरच धडा शिकवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. एवढी वर्षे कॉंग्रेस सरकारने गोव्यात राज्य करूनही गोव्याची प्रगती झालेली नाही. आता तर ते भाषेवरही हल्ला करत आहेत. त्यामुळे आता जनता गप्प बसणार नाही असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कोकणी व मराठी भाषेवर हल्ला करून ह्या सरकारने पुन्हा एकदा दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डिसोझा यांनी केला.
मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी, आमच्या भाषेचे रक्षण करण्यासाठी आज ही सभा बोलवण्यात आल्याचे सांगण्यास सुद्धा लाज वाटत असल्याचे सांगितले. कामत सरकार याला पूर्ण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काही वर्षापूर्वी कोकणी व मराठी या भाषांत वाद निर्माण करून चर्चिल आलेमाव यांनी दोन धर्मात वाद निर्माण केल्याची आठवण श्री. नाईक यांनी करून दिली. याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न चर्चिल करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. इंग्रजी भाषेच्या विरोधात आम्ही नाहीच मात्र प्राथमिक माध्यम आपल्या मातृभाषेत केल्यास भविष्यात याचा मोठा चांगला फायदा विद्यार्थ्याला मिळतो असा इतिहास असल्याचे नाईक यांनी सांगून कामत सरकारने केलेली चूक लवकरात लवकर सुधारण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले.
शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख रमेश नाईक यांनी आपल्या भाषणात बोलताना शांत असलेल्या गोव्यातील नागरिकांना विनाकारण ह्या सरकारने क्रोधीत केल्याचे सांगून हे त्यांना महाग पडणार असल्याचा इशारा दिला. इंग्रजी भाषेला आमचा कुठेही विरोध नव्हता, मात्र मराठी व कोकणी भाषेची तुलना करून आमच्या ह्या राजभाषेवरच हल्ला केल्यानेच येथील बहुसंख्याक जनता याविरुद्ध पेटलेली असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस ही फक्त गोव्याला नव्हे तर संपूर्ण भारताला लागलेली कीड असल्याचे श्री. नाईक म्हणाले. जनतेने ह्या सरकारला हाणून टाकण्याची गरज असल्याचे ते शेवटी म्हणाले. सदर सभेच्या वेळी इतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. सभेच्या नंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी लक्ष्मी नारायण देवाशी साकडे घालून कामत सरकारला लवकरात लवकर चांगली बुद्धी देण्याबाबत मागणी केली. तसेच येथे असलेला चपलांचा हार घातलेला मुख्यमंत्र्यांचा पुतळा शेवटी दहन करण्यात आला.

1 comment:

Unknown said...

Thats True