Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 16 July, 2011

राज्यसभेसाठी थेट लढत

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी २२ जुलै रोजी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांपैकी कुणीच अर्ज मागे घेतला नसल्याने खासदार शांताराम नाईक व आमदार दामोदर नाईक यांच्यात ही लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेस आघाडी सरकारातील शांताराम नाईक यांच्या विरोधकांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असा चिमटा पर्रीकर यांनी काढला. मगो पक्षाने सुरुवातीला शांताराम नाईक यांना विरोध केला व नंतर त्यांना पाठिंबा दिला. आता त्यांची नेमकी भूमिका प्रत्यक्ष निवडणुकीवेळीच स्पष्ट होणार आहे व त्यामुळे याबाबत आपण एव्हाना काहीही बोलणार नाही, अशी भूमिकाही पर्रीकर यांनी मांडली. भाजपकडे आवश्यक आमदारांचे बळ नाही हे जरी खरे असले तरी ‘क्रॉस व्होटींग’ होण्याची शक्यता अजिबात नाकारता येणारी नाही, असेही ते म्हणाले.
एका पक्षाचेच सरकार हवे
गोव्यात एका पक्षाचे सरकार सत्तेवर येणेच शक्य नाही, या भूमिकेचा पर्रीकर यांनी इन्कार केला. आघाडी सरकारांमुळे राज्याची पीछेहाट कशी होते हे गोमंतकीय जनतेने अनुभवले आहे. त्यात कॉंग्रेससारख्या पक्षाकडून आघाडीतील घटकांची कशी पिळवणूक केली जाते हे ही सर्वज्ञात आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारचा कटू अनुभव गोवेकरांनी घेतला आहे व त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखवला.

No comments: