Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 December, 2010

आरोग्यासाठी डॉ. साळकरांची‘त्रिसूत्री’

मळा येथील शिबिराचा ४०० जणांना लाभ
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
नियमितपणे सकाळी चालणे, आहारात भाज्यांचे प्रमाण वाढविणे आणि मद्यपान, धूम्रपान टाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास सामान्य माणूस निरोगी राहू शकतो, असे प्रतिपादन नामवंत कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी आज येथे केले. मळा येथील मुष्टिफंड संस्थेच्या इमारतीत श्रीविठ्ठल रखुमाई कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने पतंजली योग व ‘गोवादूत’च्या सहकार्याने आयोजित आयुर्वेदिक मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. साळकर बोलत होते. यावेळी ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हांबरे व कार्यकारी संपादक सुनील डोळे तसेच मंडळाचे अध्यक्ष विकास नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
आयुर्वेद अथवा होमिओपथी या उपचारपद्धती एखादा रोग होऊ नये यासाठी उपयुक्त आहेत अथवा साध्या विकारांवर ती प्रभावी ठरते, मात्र शस्त्रक्रिया आवश्यक ठरते, त्यावेळी ऍलोपथी पद्धतीचाच अवलंब करा, असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले. एखाद्या रोगाचा सुगावा लागल्यास त्यावेळीच तातडीने उपचार आवश्यक असतात आणि ते सध्याच्या युगात शक्य झाले आहे. असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना गंगाराम म्हांबरे म्हणाले की, ‘विधायक उपक्रमाला प्रसिद्धी देण्यामागे दोन हेतू असतात. एक म्हणजे आयोजकांचा हुरूप वाढविणे आणि दुसरा म्हणजे जे वाचक अशा उपक्रमांच्या बातम्या वाचतात, त्यांनाही प्रेरणा मिळून असे कार्य वाढीस लागावे’.
योगगुरू रामदेवबाबा यांनी चालवलेले कार्य अमौलिक असल्याचे स्पष्ट करून आरोग्यविषयक संकल्प करताना त्यात सातत्य असण्यावर सुनील डोळे यांनी आपल्या भाषणात भर दिला.
डॉ. प्राजक्ता नाईक, डॉ.आनंद व डॉ. सुनीता नार्वेकर यांनी यावेळी सुमारे ४०० रुग्णांची तपासणी केली. मंडळाचे अध्यक्ष विकास नाईक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रनिवेदन नीलेश वायंगणकर यांनी केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेटके आयोजन केलेल्या या शिबिराला पणजीवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

No comments: