Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 2 January, 2010

रोज १२ अपघात

पणजी, दि. १७ (प्रीतेश देसाई): वाहतूक पोलिस खात्याच्या नोंदीनुसार गेल्या वर्षात झालेल्या अपघाताची आकडेवारी पाहिल्यास दर दिवसाला १२ अपघात तर प्रत्येक २९ तासानंतर एका व्यक्तीचा वाहन अपघातात रस्त्यावर मृत्यू झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर ०९ या दरम्यान, ४ हजार १६४ अपघातांची नोंद झाली आहे. ३१० जणांनी वाहन अपघातात आपले प्राण गमावले आहेत. मृत झालेल्यांमध्ये १७३ जण हे दुचाकीस्वार होते. यात २० ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आज वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. राज्यात घडलेल्या गंभीर अपघातांना कारणीभूत ठरलेल्या अशा ३४९ वाहन चालकांचे वाहतूक परवाने निलंबित करण्यात आले असल्याचीही माहिती श्री. गावस यांनी दिली. ३६ टक्के अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर झालेले असून ६७ टक्के अपघात हे सरळ रस्त्यावर झालेले आहेत. तसेच, बरेच अपघात हे सायंकाळी घरी परतण्याची वेळी म्हणजे ६ ते ७ या दरम्यान झाले आहेत. तसेच, सोमवारच्या दिवशी जास्त अपघात होत असल्याचे निरीक्षणास आले असल्याची माहिती श्री. गावस यांनी दिली. सर्वांत जास्त अपघात हे वेर्णा भागात झालेले आहेत. तर, वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या फोंडा भागात जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षाच्या तुलनेनुसार काही प्रमाणात अपघातांची संख्या घटली आहे. त्या तुलनेत १४ अपघात आणि ८ मृत्यूही कमी झाले असल्याचे यावेळी श्री. गावस म्हणाले. २००८ साली ४ हजार १७८ वाहनांचे अपघात ३१८ जणांवर मृत्यू ओढवला होता. पोलिस खात्याने आणि "मार्ग' तसेच "गोवा कॅन' या सामाजिक संस्थानी वाहतुकीविषयीची केलेल्या जनप्रबोधनामुळे काही प्रमाणात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे मत श्री. गावस यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षभरात ५ हजार ५०७ वाहन चालक तर, ११ हजार ९२६ विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गोव्यात नोंद झालेल्या वाहनांची संख्या सध्या सात लाख असून ही सर्व वाहने या रस्त्यावर धावत आहेत. त्यात दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होते. या वाढत्या वाहनांची सख्या आणि घटलेल्या अपघाताची संख्या पाहिल्यास या प्रशिक्षणांचा लाभ झाला असल्याचे म्हणता येईल तसेच, गेल्या वर्षभरात वाहतूक खात्याने राज्यात सुमारे १०० अपघात क्षेत्र म्हणून निश्चित केले होते. तसेच त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवण्यात आले होते. त्याठिकाणी योग्य ते बदल करण्यात आल्याचेही श्री. गावस यांनी सांगितले. पोलिस वाहतूक विभागाने वाहनांत अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या ३०० पेक्षा कमी करण्याचा उद्देश ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्किंग समस्या गंभीर
राज्यात वाहनांच्या संख्येत भरमसाट वाढ होत असून येणाऱ्या काळात वाहतुकीची आणि पार्किंगची भीषण समस्या निर्माण राहणार आहे. त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या वीस वर्षानंतरचा विचार आणि राज्यातील वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथील "सेंट्रल रोड रिसर्च इंस्टिट्यूट'कडे करार केला जाणार असल्याची माहिती पोलिस वाहतूक अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. येत्या काही महिन्यात वाहतूक खाते या करारावर सही करणार आहेत. गोव्यातील वाहतूक आणि पार्किंग समस्या यावर अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच, तात्पुरत्या आणि कायम स्वरूपी करावयाच्या सूचना ही संस्था गोवा सरकारला करणार आहेत. चौपदरी मार्ग होणार असल्याचे कदंब बसस्थानक आणि पर्वरी येथील "ओ- कॉकेरो'कडे उड्डाण पूल बाधण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

No comments: