Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 1 January, 2010

मेहा त्यानंतर १२ तास जिवंत होती...

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): मृत्युमुखी पडलेली २३ वर्षीय तरुणी मेहा बहुगुणा हिला कांदोळी येथील सनबर्न महोत्सवात सर्वांत शेवटी पाहण्यात आले होते. मेहा हिच्या मृतदेहावर आज शवचिकित्सा करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. "व्हिसेरा' अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे उघड होणार असल्याचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली असून अद्याप कोणावरही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
दरम्यान, तिच्या वडिलानी आपल्या मुलीच्या मृत्यूमागे कोणताही घातपात असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच, आपण पोलिस तक्रारही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांना वाटत असल्यास ते स्वतः ती दाखल करून घेऊ शकतात, असे तिचे वडील मनू बहुगुणा यांनी पत्रकारांना सांगितले. तर, "या महोत्सवाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले होते. ज्याद्वारे या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवले जात होते. या पार्टीत अमली पदार्थांना मज्जाव करण्यात आला होता, तर पोलिसही या ठिकाणी तैनात होते. असे असतानाही जर एखादी व्यक्ती अशा ठिकाणी अमली पदार्थ आणण्यास यशस्वी ठरली तर आम्ही काय करू शकतो' असे महोत्सवाचे भागीदार लिन्डोन एल्वीस यांनी म्हटले आहे. मयत मेहा हिचा मृत्यू अमली पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्याने झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
"सनबर्न' पार्टी सुरू होती, त्याठिकाणी आयोजकांतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात आल्या होत्या. या "सीसीटीव्ही'तील सर्व चित्रीकरण पोलिसांनी मागितले आहेत. तसेच, ज्या इस्पितळात या तरुणीवर उपचार केले त्या इस्पितळातील डॉक्टरांचीही जबानी नोंद करून घेण्यात आली आहे. तिला इस्पितळात घेऊन आलेल्या तिच्या मित्रांचीही जबानी नोंद करून घेण्यात आली असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. सुमारे बारा तास ती जिवंत होती. या दरम्यान, तिची जबानी पोलिसांनी घेता आली असती. परंतु, इस्पितळातून पोलिसांना तिच्याविषयीची कोणताही माहिती देण्यात आली नाही. तसेच, तिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आल्याचे श्री. देशपांडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मेहाच्या मित्रांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे तिने शेवटच्या क्षणी "एंजल डस्ट'चे सेवन केले होते,ज्याचा समावेश अमली पदार्थात केला जातो. त्याचे सेवन करताच ती अस्वस्थ झाली. तिला तिच्या मित्रांनी त्वरित कळंगुट येथील एका इस्पितळात दाखल केले. तिथे तिची तब्येत अधिकच बिघडल्याने तिला त्वरित पणजीतील एका इस्पितळात हलविण्यात आले. बुधवारी दुपारी तिने शेवटचा श्वास घेतला. त्या मुलीला अगदी सहजगत्या अमली पदार्थ उपलब्ध झाले असून, सदर ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांकडे असताना देखील त्याच्या विरोधात त्वरित कारवाई करण्यास पोलिस अपयशी ठरले, याविषयीचा पुढील तपास कळंगूट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नॉलास्को रापोझ करीत आहेत.
एंजलडस्टचा परिणाम?
मयत मेहाने घेतलेले अमली पदार्थाचे नाव "फिनसायक्लिडायन' म्हणजेच "अँजल डस्ट' असे आहे. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यामध्ये ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे, पीसीपी, अँजल डस्ट, सुपरग्रास, बोट, टीक टॅक, झूम, शर्मन्स. फिनसायक्लिडायन (पीसीपी) ची निर्मिती १९५० मध्ये गुंगीच्या औषधात उपचारासाठी करण्यात आले होते. मात्र त्याच्या निर्मितीत गोंधळ निर्माण झाल्याने व त्याचे दुष्परिणाम व "साईड इफेक्टस्' जाणवू लागल्याने औषधातील त्याचा वापर थांबवण्यात आला होता. "अँजल डस्ट'चा परिणाम खूपच अनिश्चित आहे. याचा परिणाम सेवनामुळे वेळ, स्थळ याचे भान तर हरपतेच शिवाय आपल्या शरीरातील संवेदनशीलताही नष्ट होते. शरीर हलके होऊन तरंगत असल्याची भाव निर्मिती होते. आपले सभोवतालच्या वातावरणाशी, समाजाशी काहीच घेणे देणे नसल्याच्या आविर्भावात याचे सेवन करणारे वावरतात. या अमली पदार्थाचा वापर करणाऱ्यात आवाज आणि दृश्यांच्या विभ्रमात असतो. "अँजल डस्ट' शरीरात हृदयाचे ठोके वाढवण्यासोबतच उच्च रक्तदाबही निर्माण होतो. शरीराचा थरकाप, पुष्कळ घाम येणे, ताप आणि मांसपेशींची गुंतागुंत अशा समस्या निर्माण होऊ शकतात.अगदी कमी प्रमाणातही "अँजल डस्ट'चा वापर मानसिक दुष्परिणाम करतो. याचा एक डोसही अशा शारीरिक समस्या निर्माण करू शकतो ज्याच्यावर उपचार होण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधीही अपुरा पडेल. अतिसेवनामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
------------------------------------------------------------------------
मित्र झाले गायब!
दि. २९ डिसेंबर रोजी सनबर्न पार्टीत सहभागी झालेली मेहा अचानक खाली कोसळताच तिला रुग्णवाहिकेतून कळंगुट येथील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्याच ठिकाणी असलेल्या पोलिसांना याची कोणतीही माहिती पुरवण्यात आली नाही. मेहा हिची प्रकृती गंभीर असल्याचे तिला कळंगुट येथून पणजी येथील एका खाजगी इस्पितळात हलवण्यात आले. तिला या इस्पितळात दाखलही करून घेण्यात आले. तरीही इस्पितळाच्या डॉक्टरनी याची माहिती पोलिसांना दिली नाही. उपचार सुरू असताना दुपारी ३ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री ७ वाजता कळंगुट पोलिसांना कळविण्यात आले, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मेहा हिचा मृत्यू होई तोवर ही माहिती पोलिसांपासून का लपवण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, बंगळूर येथून मेहा हिच्यासोबत काही तरुणतरुणींचा गट आला होता. तिचे मित्र कुठे गायब झालेत, याची कोणतीही माहिती पोलिसांना नाही. या घटनेमागे कोणताही पुरावा न ठेवण्यासाठी तिच्याबरोबर असलेल्या मित्रांच्या गटाला अलिप्त ठेवले जात नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

No comments: