Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 31 December, 2009

पर्येत धनगरांची घरे व गोठे जमीनदोस्त

..अपुरी पर्यायी व्यवस्था
..गुरांचा प्रश्न अनिर्णित
..तेथे कॉलेज उभारणार


केरी-सत्तरी, दि. ३० (वार्ताहर) - पर्ये सत्तरी पंचायत क्षेत्रातील धनगरधाट या ठिकाणी असलेली धनगर समाजाची पाच घरे व चार गोठे आज "अतिक्रमणविरोधी पथका'द्वारे जमीनदोस्त करण्यात आले. या पठारावर व्यवस्थापन महाविद्यालय उभारत असल्याने त्यांना हटवण्याचे प्रयत्न मागील एक वर्षापासून चालू होते. शेवटी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तेथे एकूण सात घरे आणि त्यांचे गोठे मागील कित्येक पिढ्यांपासून अस्तित्वात आहेत. त्यातील तीन घरांना पंचायतीतर्फे क्रमांकही देण्यात आले आहेत. त्या घरांची घरपट्टीही भरण्यात येते. मागील एका वर्षापासून त्यांना "आपण बेकायदा बांधकामे केलेली असून ती तुम्ही खाली करा' अशा नोटिसा येत होत्या. शेवटी पंचायतीकडून सर्वे क्र. ५८-१ येथे ही बांधकामे आज (दि. ३०) रोजी पाडली जातील असे पत्र पाठवण्यात आले. सकाळी पोलिस फौजफाटा तालुका मामलेदार, गटविकास अधिकारी , पोलिस निरीक्षक, पर्ये पंचायत मंडळ यांच्यासमक्ष सदर कारवाई करण्यात आली. या अंतर्गत बाबू मानू शेळके, भागदो मानू शेळके, धोंडू रामा वरक, नारायण भागो झोरे यांची घरे व भागी बाबी आवदाणे, कोंडो झोरे, धोंडो रामा वरक व भागो जनो शेळके यांचे बकऱ्या व म्हशींचे गोठे जमीनदोस्त करण्यात आले.
मागील वर्षी काही घरांवर पंचायतीद्वारे कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या बदल्यात दुसरी सात घरे सत्तरी युवा मोर्चाने बांधली होती. या घरांत स्थलांतराची त्यांची तयारी होती. परंतु तेथे असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे ते तेथे जाण्यास राजी नव्हते. त्या घरांना क्रमांकही दिले नव्हते. ती घरे पंचायतीत नोंदणीकृत करून आम्हाला घर क्रमांक द्यावा अशी त्यांची मागणी असताना नवीन घरे त्यांच्या नावावर असल्याचे कोणतेही लेखी पत्र त्यांना न मिळाल्याने आत्तापर्यंत हे स्थलांतर रखडले होते. नवा घरदाखला व त्या जाग्यावर वीजपुरवठा व पक्क्या रस्त्याची सोय नसल्याने आज सकाळी या कुटुंबांनी प्रथम घरे खाली करण्यास नकार दर्शवला. शेवटी सरपंच अक्षया शेट्ये सत्तरी धनगर समाजाचे अध्यक्ष बी. बी. मोटे यांच्या मध्यस्थीने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यातचे आश्वासन दिल्याने ही कुटुंबे घरे खाली करण्यास राजी झाली व लवकरच घरांना घरक्रमांक देण्यात येईल व पाणीवीज करण्यात र्येईल, असे सरपंच शेट्ये यांनी सांगितले. यावेळी पाडलेल्या घरांतील सामान बाजूला करण्यास सदर धनगरांना वेळही दिला नाही तसेच त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनीही कोणतीही मदत केली नाही. यावेळी सदर धनगरांनी आम्ही घरांमध्ये राहू पण आमच्या जनावरांना कोठे ठेवणार, असा सवाल केला आहे.

No comments: