Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 June, 2009

प्रसंगी प्राणाची आहुती कळणेवासीयांचा निर्वाणीचा इशारा

भूमिपुत्रांच्या मदतीस
वैशाली पाटील येणार

पणजी, दि. १८ (प्रीतेश देसाई): मेसर्स मिनरल ऍंड मेटल या खाण कंपनीच्या विरोधात खदखदत असलेल्या कळणे गावातील भूमिपुत्रांनी वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्याची तयारी दर्शवली आहे. २४ जून रोजी ओरोस येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर कळणे गावातील सर्व रहिवासी, खाण कंपनीला देण्यात आलेला परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहेत. या मागणीला प्रशासनाने दाद न दिल्यास त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा गावातील काही तरुणांनी दिला आहे. पणजीपासून ६७ कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या हद्दीतील गोव्याशी साम्य दाखवणाऱ्या कळणे गावात १९ मार्च ०९ पासून सुरू झालेले जनआंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात "सेझ'प्रकल्पांच्या विरोधात लढणाऱ्या वैशाली पाटील उद्या दुपारी कळणे गावात येणार असून त्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या या जनआंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती गावच्या सरपंच सुनीता भिसे यांनी दिली.
गावातील लोकांमध्ये दहशत माजवणे, महिलांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग करणे तसेच जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणे आणि खोट्या खून प्रकरणात गावातील १६ कर्त्या पुरुषांना तुरुंगात डांबल्याने दोडामार्ग पोलिस स्थानकाचे निरीक्षक नंदकुमार देशमुख यांना त्वरित निलंबित करण्याची जोरदार मागणी कळणेवासीयांनी केली आहे. तसेच १६ जणांवर लावण्यात आलेले ३०२ कलम रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या खाणीच्या विरोधात कळणे गावातील श्री देवी माउली मंदिरात गावातील महिला आणि पुरुषांनी गेल्या अडीच महिन्यांपासून "भजन सत्याग्रह' सुरू ठेवला आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत महिला तर सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत पुरुष या मंदिरात ठाण मांडून असतात.
मंदिराच्या पाट्यांवर कागदी फलक लावण्यात आले असून त्यावर ""हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा'', ""आंब्याच्या फांदीवर बसला आहे मोर, मंत्र्याचा मुलगा मायनिंग चोर'' अशा घोषणा लिहून लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र प्रशासनाने अद्याप दाद दिली नसून सत्ताधारी पक्षाचा एकही नेता गावाकडे फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातही तीव्र गरळ ओकली जात आहे. ""नारायण राणे हे विधानसभेत खोटे बोलत असून त्यांनी विधानसभेत कळणे आंदोलनाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी गावात भेट देऊन आधी पाहणी करावी'', असे रोखठोक आव्हान यावेळी सरपंच सुनीता भिसे यांनी दिले आहे.

No comments: