Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 June, 2009

आमिषे दाखवून धर्मांतर अयोग्यच

आर्चबिशपच्या प्रवक्त्याचा खुलासा
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : विविध प्रकारची आमिषे दाखवून करण्यात येणारे धर्मांतर योग्य नाही. राज्यात बिलिव्हर्सतर्फे होत असलेल्या धर्मांतराच्या या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका गोव्यातील चर्चने घेतली आहे. व्हॅटीकन चर्च अशा प्रकारच्या धर्मांतराच्या विरोधात असल्याचा दावा यावेळी आर्चबिशपचे प्रवक्ते फा. फ्रान्सिस्को कालदेरा यांनी केला आहे.
पैशांच्या आमिषांना बळी पडून धर्म बदलणारे हे स्वधर्मातही राहत नाही आणि त्यांनी नंतर स्वीकारलेल्या धर्मांतही त्यांना मानाचे स्थान मिळत नाही, असे फा. कालदेरा यांनी सांगितले. गोव्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या गरीब व गरजू लोकांचा फायदा उठवत बिलिव्हर्स पंथाने त्यांना आमिषे दाखवून धर्मांतर करण्याचे सत्र सुरू केल्याचे प्रकरण गोवादूतने उजेडात आणले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता फा. कालदेरा यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
या बिलिव्हर्स पंथीयांवर आमचा कोणताही अधिकार नाही आणि आम्ही त्यांचा या कृतीचा स्वीकारही आम्ही करत नाही. येशू ख्रिस्ताला पुजण्यासाठी आणि त्याची तत्त्वे जपण्यासाठी धर्म बदलावा लागतो, असेही आम्हांला वाटत नाही, असे फा. कालदेरा म्हणाले. सन १९६० मध्ये रोममध्ये झालेल्या एका सभेत धर्म प्रमुखाने कोणाचेही धर्मांतर करू नये, असे स्पष्ट केले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. हिंदू धर्मात खूप चांगली तत्त्वे आहेत, व्हॅटीकन चर्चमध्ये त्याची नेहमी प्रशंसाच केली जात असल्याचे ते म्हणाले.
धर्मांतराचा हा प्रकार येणाऱ्या काळात डोकेदुखी बनणार असून आमच्याकडे नेमकी तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचे "स्पेशल सेल'चे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
राजधानीपासून काही अंतरावर असलेल्या चिंबल आणि मेरशी परिसरात मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर करण्यात आल्याचे गोवादूतने उघड केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. "सेवा ट्रस्ट ऑफ इंडिया' या बिगर सरकारी संस्थेतर्फे गरिबांना मदत करत असल्याचे भासवण्यात येत असले तरी ही संस्था गोव्यात धर्मांतराच्या कार्यात गुंतल्याचे उघड झाले आहे. राज्यात शंभर पेक्षा जास्त बिलिव्हर्सची प्रार्थनास्थळे चालत असल्याचा दावा या ट्रस्टने केला असून ६० पेक्षा जास्त लहान मुलांचा सांभाळ करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या मुलांना त्यांच्या आई वडिलांची भेट घेण्यास मिळत नसून केवळ रविवारच्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आपल्या मुलांना पाहण्याची मुभा मिळते. या सर्व मुलांना पणजीतील एका हॉटेलमध्ये प्रार्थनेसाठी बसमधून आणले जाते, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

No comments: