Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 March, 2009

सारमानस ते टोंक फेरीसेवा संतप्त प्रवाशांनी रोखली

महिलांचा पुढाकार
डिचोली, दि.१२(प्रतिनिधी)- सारमानस ते टोंक या जलमार्गावरील फेरीसेवा आज संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर रोखून, सारमानस धक्क्यावर फेरीबोट अडवून ठेवली. गेले आठ महिने चाललेल्या अत्यंत बेशिस्त व बेपर्वा प्रवासी वाहतुकीचा निषेध करीत या जलमार्गावर दोन सुस्थितीतील फेरीबोटी उपलब्ध करण्याचे ठोस आश्वासन खात्याकडून मिळविले.
संपूर्ण दिवसभर फेरीसेवा बंद
सारमानस ते टोंक या जलमार्गावरील फेरीसेवा ही गेली अनेक वर्षे बेभरवशाची झाली आहे. पिळगाव ग्रामपंचायतीतर्फे तसेच रोज या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी याविषयी नदी परिवहन खात्याकडे असंख्य निवेदने सादर करून सुरळीत फेरीसेवेची मागणी केली होती.पण खात्यातर्फे या सर्व निवेदनांना आत्तापर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या.
या फेरीसेवेचा वापर सारमानस, माठवाडा, बागवाडा तसेच अन्य ठिकाणचे रोजंदारीवर सांतइस्तेव्ह इथे काम करणारे महिला व पुरुष कामगार मोठ्या प्रमाणात करतात. तसेच औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या अल्प पगारावर काम करणाऱ्या महिला या फेरीसेवेवर अवलंबून असतात. पण इथली फेरीसेवा ही प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरत असून नोकरीवर जाणाऱ्यांना तसेच अन्य प्रवाशांना, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.या सर्वांचा उद्रेक होऊन आज या जलमार्गावर असलेली एकच फेरी सारमानस धक्क्यावर सकाळी पावणेसात वाजता अडविण्यात आली.
याविषयी डिचोली पोलिसस्थानकात ग्रामपंचायत मंडळाने निवेदन दिले होते.नदी परिवहन खात्याचे रहदारी अधिकारी बाबलो प्रभू व वासुदेव गांवकर तब्बल चार तासानंतर घटनास्थळी पोहोचले. यावेळी आंदोलकांनी त्यांना या मार्गावर सेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फेरीबोटीची "अवस्था' दाखवून जाब विचारला. प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळण्याच्या या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दोन सुस्थितीतील फेरीबोटी रात्रौ बारा वाजेपर्यंत सतत सुरू ठेवण्याची मागणी केली तसेच इथली फेरीबोट दुसऱ्या जलमार्गावर हलविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करावी, फेरी कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी बदली करावी वगैरे मागण्या केल्या. या मागण्या पणजी कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करा असा सल्ला या अधिकाऱ्यांनी देताच वातावरण बरेच तापले.शेवटी शिष्टमंडळासह मागण्यांचा मसुदा ग्रामपंचायत कार्यालयात तयार करून तो पणजीला पाठविण्यात आला.
आज फेरीबोट अडवून ठेवणाऱ्यांमध्ये रोजंदारीवर कामासाठी जाणाऱ्या महिला वर्गाचा मोठा सहभाग होता. तसेच जिल्हा पंचायत सदस्य तथा माजी सरपंच जयदेव परब गावकर यांनीही आंदोलकांबरोबर राहून चर्चेत भाग घेतला व सुरळीत फेरीसेवेसाठी आग्रह धरला.

No comments: