Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 March, 2009

इतिहासाच्या पुस्तकात मोगलांचाच उदोउदो

- शिवरायांच्या "छत्रपती'
पदवीलाही अर्धचंद्र
- पुस्तकावर त्वरित बंदीची
हिंदू जनजागृतीची मागणी


पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - दहावीच्या इंग्रजी व मराठीच्या पुस्तकात केलेल्या असंख्य चुकांचे उदाहरण ताजे असतानाच आता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगलांचा उदोउदो करण्यात आला असून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराजांच्या नावापुढे "छत्रपती' असा उल्लेखही करण्यात आला नसल्याने "एनसीईआरटी'ने बनवलेल्या या पुस्तकावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. इतिहासाचे "हिरवेकरण' त्वरित थांबवावे, अशी मागणी करून त्याविरोधात येत्या १३ मार्च रोजी गोवा व महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याचे समितीचे संघटक जयेश थळी यांनी आज येथे पत्रपरिषदेत सांगितले. मराठी राज्य भाषा प्रस्थापना समितीचे रमेश नाईक उपस्थित होते.
शिवजयंतीदिनी म्हापसा येथील शिवरायांच्या पुतळ्यासमोर या पुस्तकाविरोधात निदर्शने करून आंदोलनास आरंभ केला जाणार आहे. मोर्चे, निषेध फेऱ्या, धरणे, उपोषण असे या आंदोलनाचे स्वरूप असेल. "एनसीईआरटी' अभ्यासक्रमांच्या समितीवर कम्युनिस्ट विचारसरणीच्या हिंदूद्रोहींचा भरणा केंद्र सरकारने केला असल्याची टीका रमेश नाईक यांनी केली. या समितीवर प्रो. निलाद्री भट्टाचार्य व कुणाल चक्रवर्ती यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी केली.
इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा केवळ ४ ओळींचा इतिहास देऊन, मोगलांचा इतिहास ५० ते ६० पाने भरून शिकवणाऱ्या "एनसीईआरटी'चा हिंदू जनजागृती समितीने कडाडून निषेध केला आहे. "एनसीईआरटी'चा अभ्यासक्रम कायम वादग्रस्त ठरत आहे. कधी भगतसिंग आदी क्रांतिकारकांना "दहशतवादी' म्हणून त्यांचा अपमान केला जातो तर, कधी विकृत इतिहास मांडला जातो. २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आलेल्या सातवीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकात १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या मोगल व मुसलमान राजांच्या माहितीसाठी खर्ची घालण्यात आली आहे. मात्र मोगलांशी लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ चार ओळीत मांडण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, सोळाव्या शतकातील बाबर, अकबर यांची चित्रे असलेल्या या पुस्तकात १७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रही दिलेले नाही. यातून या पुस्तकात छ. महाराजांना केवळ दुय्यमच नाही तर, नगण्य स्थान दिल्याचे निदर्शनास येते. तसेच राजपुतांच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचे नावही दिलेले नाही, अशी माहिती श्री. थळी यांनी दिली.
केंद्रातील हाच अभ्यासक्रम महाराष्ट्रातील अनेक विद्यालयात सुरू असून लाखो विद्यार्थ्यांच्या मनावर चुकीचा इतिहास बिंबवला जात आहे. त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या "एनसीईआरटी'च्या पुस्तकातील मजकूर त्वरित बदलण्यात यावा, अशी मागणी "मराप्रस'चे रमेश नाईक यांनी केली.

No comments: