Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 6 November, 2008

बी.आर.चोपडा काळाच्या पडद्याआड

मुंबई, दि. ५ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि छोट्या पडद्यावरील "महाभारत' या महामालिकेद्वारे लोकांच्या मनात घर करणारे बलदेव राज उर्फ बी. आर. चोपडा यांचे आज बुधवारी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि आजारपणातच जुहू येथील निवासस्थानी सकाळी ८.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठितांमध्ये चोपडा परिवाराचे नाव घेतले जाते. बी. आर. यांच्या पश्चात चित्रपट निर्माता असलेले त्यांचे पुत्र रवी चोपडा, शशी व निना या दोन मुली आहेत. चित्रपट निर्माते यश चोपडा यांचे ते मोठे बंधू होत.
धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी त्या त्या काळात दिले आहेत. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून "महाभारत' महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
लुधियाना, पंजाबमध्ये २२ एप्रिल १९१४ रोजी जन्मलेल्या बी. आर. चोपडा यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ चित्रपट पत्रकारितेपासून सुरू केला होता. तेथूनच त्यांना चित्रपटाची आवड निर्माण झाली. फाळणीनंतर ते आधी दिल्लीला आले आणि नंतर मुंबईला येऊन स्थायिक झाले. त्यांनी "सिने हेरॉल्ड' मध्ये चित्रपटांची समीक्षा लिहिणे आणि संपादन करण्यापासून या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. १९४९ साली त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपट "करवात' सपशेल कोसळला. त्यानंतर चोपडा यांनी १९५१ साली "अफसाना' चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट राहिला. चरित्र अभिनेता अशोक कुमार यांची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाने सिल्व्हर ज्युबिली साजरी केली होती. नंतर त्यांनी १९५५ साली स्वत:च्या बी. आर. फिल्मस या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्यांनी काढलेल्या "नया दौर' चित्रपटाला भरघोस प्रसिद्धी मिळाली. या यशानंतर त्यांनी मोठ्या उत्साहात १९५६ साली "एक ही रास्ता' या चित्रपटाची निर्मिती केली. विधवा पुनर्विवाहावर आधारित या चित्रपटानंतर त्यांनी अनेक दर्जेदार व लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.
त्यांनी आपला लहान भाऊ यश चोपडाला "धूल का फूल'च्या निमित्ताने पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याची संधी दिली. गायक महेंद्र कपूर यांच्या कारकीर्दीला वाढविण्यात बी. आर. चोपडा यांचे योगदान मोठे होते. आपल्या जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी महेंद्र कपूर यांना संधी दिली होती, हे येथे उल्लेखनीय.

No comments: