Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 8 November, 2008

रणधुमाळीला सुरूवात

पाळी पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल
डिचोली, दि. ७ (प्रतिनिधी) - पाळी पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आज (शुक्रवारी) खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या (शनिवारी) संपत असून आज एकूण सहा उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. कॉंग्रेसचे उमेदवार प्रताप गावस, अपक्ष उमेदवार राजेंद्र राणे यांच्यासह माजी आरोग्यमंत्री डॉ.सुरेश आमोणकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. सौ.गीता प्रताप गावस व सेव्ह गोवा फ्रंटतर्फे जुझे लोबो यांनीही आपला अर्ज सादर केला आहे. भाजपतर्फे डॉ.प्रमोद सावंत उद्या ८ रोजी आपला अर्ज सादर करणार आहेत.
येत्या २६ नोव्हेंबर रोजी पाळी पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचा सहावा दिवस होता. उद्या शेवटचा दिवस असल्याने रिंगणात एकूण किती उमेदवार राहणार हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या डॉ.आमोणकर यांच्या या निर्णयामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून डॉ.आमोणकरांचा हा निर्णय पूर्ण चुकीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शेवटपर्यंत डॉ.आमोणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.
कॉंग्रेसतर्फे प्रताप गावस यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी, पाळी मतदारसंघाच्या विकासाबाबत केवळ आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात मात्र काहीही होत नाही, असा सवाल केला असता पाळीसाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार असून त्यांची सुरुवात झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान,मगो पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नसला तरी अद्याप कॉंग्रेसला जाहीर पाठिंब्याबाबत मौन धारण केल्यानेही कॉंग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.
भाजपतर्फे आज उमेदवारी
भाजपचे युवा उमेदवार डॉ.प्रमोद सावंत हे उद्या ८ रोजी आपला अर्ज सादर करतील. भाजपने पाळी मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. डॉ.आमोणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरही तोडगा निघेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्यात सध्या सुरू असलेली राजकीय हाणामारी व कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा यामुळे लोक या सरकारवर खवळले आहेत. विकासकामांसाठी सरकारकडे पैसा नसून केवळ आश्वासनांच्या खैरातही करून जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे प्रकार प्रचारावेळी उघड केले जातील,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments: