Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 November, 2008

'वंडरबॉय'ची करामत, सचिनने ठोकले चाळीसावे कसोटी शतक

जामठा, दि. ६ : ऍडलेड (ऑस्ट्रेलिया) कसोटीनंतर सात सामने खेळलो, पण शतक काढू शकलो नाही. आज संघाला गरज असताना शतक लागले याचा आनंद आगळा असल्याचे "वंडरबॉय' सचिन तेंडुलकरने पत्रपरिषदेत सांगितले. येथील जामठा स्टेडियमवर पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या खेळानंतर तो उत्साहात पत्रकारांशी बोलत होता. एकूण ४० कसोटी शतके त्याच्या नावावर लागली असून हा विक्रम मोडण्याची क्षमता सध्याच्या कोणत्याही खेळाडूंत नसल्याचे दिसून येते.तसेच सतत निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या माध्यमांना आणि समीक्षकांना त्याने आपल्या या बहारदार कामगिरीद्वारे सणसणीत चपराक लगावली आहे.
पहिल्या दिवशी तीन गडी बाद व्हावयाला हवे होते. मात्र, पाच गडी बाद झाले. तीन गडी बाद झाल्यानंतर माझ्यावर फलंदाजीचे दडपण आले. मात्र, लक्ष्मणसोबत चांगली भागीदारी झाल्यामुळे ते दूर झाले. शतकांच्या आनंदापेक्षा संघासाठी काही केल्याबद्दल जास्त आनंद झाला, असे त्याने यावेळी सांगितले.
शतकाच्या जवळ असताना दोन झेल सुटले त्यावेळी एकाग्रता भंग झाली नव्हती. मात्र, दडपण वाढले होते, अशी कबुलीही त्याने यावेळी दिली. मुरली विजय याने चांगली फलंदाजी केली. तो एक चांगला फलंदाज आहे, असे सचिन म्हणाला.
जामठा व्हीसीएची खेळपट्टी चांगली आहे. दोन दिवसानंतर खेळपट्टी फिरकीला अनुकूल होईल. आज क्रेझा याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, तो "अनलकी' राहिला. आम्हाला मोठी धावसंख्या केल्यानंतर त्यांचे गडीही बाद करण्याची गरज आहे, असे त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सौरभचे भावनावर नियंत्रण आहे. तो शेवटची कसोटी म्हणून खेळत नाही तर त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले आहे, याकडेही सचिनने लक्ष वेधले.
जगातील एक उत्कृष्ट असे जामठ्याचे व्हीसीए स्टेडियम आहे. सुविधा उत्तम आहेत. जिम व खेळाडूंचा कक्ष चांगला आहे, असेही त्याने सांगितले.
कर्णधाराचा विश्वास कमावला : क्रेझा
दरम्यान, कसोटी पदार्पणातच पहिल्या दिवशी तीन गडी बाद करीत कर्णधाराचा विश्वास कमावला, असे ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर क्रेझा याने सामन्यानंतर एका पत्रपरिषदेत सांगितले. सामन्यापूर्वी मी नर्व्हस होतो. पॉन्टिंग व हेडन याने शांत करीत मला "रिलॅक्स' केले.
सहा आठवड्यापासून संघासोबत होतो. शेवटी चवथ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली त्याचेच मी चीज केले, असे क्रेझा पत्रकारांना म्हणाला.
भारतीय खेळपट्टीवर संयमाची आवश्यकता असते तो मी ठेवला व भारताचे तीन गडी घेण्यात यशस्वी झालो, असे त्याने सांगितले.
प्रथम मी मध्यमगती गोलंदाज होतो. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे मी फिरकी गोलंदाज झालो. मार्क वॉ हा माझा आदर्श आहे असे सांगून म्हणाला, ऑस्ट्रेलियात ऑफ स्पिनर कमी आहेत. तीनच असे ऑफ स्पिनर गोलंदाज आहेत की, ज्यांच्या नावावर शंभरापेक्षा अधिक कसोटी बळी आहेत.
बिशनसिंग बेदींनी दिलेल्या टिप्सचा फायदा मला झाला. त्यांनी गोलंदाजी करताना क्रीजवर रिलॅक्स होऊन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. त्याचा आज फायदा झाला, असे शेवटी क्रेझाने सांगितले.

No comments: