Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 3 November, 2008

कोलवाळच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा रुद्रावतार!

..सरपंच व पोलिसांनाही सभागृहात कोंडले
..सरपंचासह तिघा पंचांच्या राजीनाम्याची मागणी
..येत्या रविवारी पुन्हा ग्रामसभा बोलावली

मोरजी, दि. २ (प्रतिनिधी): पंधरा दिवस पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या कारणावरून कोलवाळच्या ग्रामसभेत आज ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सरपंच विठू वेंगुर्लेकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करतानाच, ग्रामसभा अर्ध्यावर सोडून गेलेल्या तीन पंचांनीही राजीमाना द्यावा असा आग्रह धरला. ही ग्रामसभा तब्बल साडेसहा तास चालली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ग्रामसभा संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत चालू होती. पुढील ग्रामसभा येत्या रविवारी ९ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
सकाळी ग्रामसभा सुरू होताच, सरपंच विठू वेंगुर्लेकर यांच्यावर उपस्थितांनी प्रश्नांचा भडिमार केला. सरपंच समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने संतप्त बनलेल्या युवकांनी दरवाजे बंद करून सरपंच व पंचांना सभागृहातच कोंडून ठेवले व राजीनाम्याची मागणी केली. यावेळी खुर्च्या फेकण्याचे व शिव्या देण्याचे प्रकारही घडले. यावेळी सभागृहात पोलिस आल्याने उपस्थितांनी त्यांना हरकत घेतली व पोलिसांना बोलावण्याची गरज काय, असा प्रश्न विचारला.
संध्याकाळी ४.३० वाजता सरपंचांनी ग्रामसभा आटोपती घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थित संतप्त झाले. सरपंचांना सुखरूप जाता यावे यासाठी पोलिस प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांनी पुन्हा आक्षेप घेत सरपंच व पोलिसांना कोंडून ठेवण्यासाठी दरवाजे बंद केले. अखेर म्हापसा पोलिस उपअधीक्षक सुभाष गोलतेकर यांनी सभागृहात प्रवेश करून सरपंचांची सुटका केली व त्यांना पोलिस वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकांनी पुन्हा गडबड केली व ग्रामसभा न संपविता सरपंच कसे काय जाऊ शकतात, असे विचारत आरडाओरड केली. गोलतेकर यांनी सर्वांना समजाविण्याचा प्रयत्न केला, तरीही युवकांनी पोलिस वाहने एक तास अडवून ठेवली. जे विकास करू शकत नाहीत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी एकच मागणी लोकांनी लावून धरली. पंच ज्योती पेडणेकर, देवीदास वारखंडकर, झेवियर डिसोझा व देवानंद नाईक या चार सदस्यांनी आपले प्रभाग दुर्लक्षित असल्याचे ठासून सांगितले. ग्रामसभा अर्धवट टाकून गेलेले उपसरपंच फोरिन्हा एस्ट्राईस, संतोष आसोलकर व आशा चोडणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव संमत करून येत्या रविवारी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सरपंच व अन्य पंचांना निष्क्रियतेच्या निषेधार्थ बांगड्या देण्याचाही प्रयत्न झाला. जो कोणी बोलविता धनी असेल, त्याच्याकडून कामे करून घ्या, असेही ग्रामस्थांनी सरपंचांना सुनावले व गेल्या २० वर्षात कोणती समस्या सोडविली, अशी विचारणा केली. निराधार महिलेचा हलविण्यात आलेला चहाचा गाडा, औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रश्न, सुलभ शौचालये आदी मुद्यांवर खडाजंगी झाली. बाबनी साळगावकर, सुभाष आरोंदेकर, बाबली गावकर, मॅथ्यू परेरा आदींनी चर्चेत भाग घेतला.

No comments: