न्यायालयाचा महापालिकेला आदेश
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पणजीत ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची आणि घाणीची गंभीर दखल घेताना येत्या ४८ तासांच सारे शहर स्वच्छ करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज पणजी महापालिकेला दिला. तसेच याबाबतचा अहवाल येत्या बुधवारी सादर करण्याची सूचना न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर व न्या. एन. एस. ब्रिटो यांनी केली आहे.
पणजीत दिवसेंदिवस कचऱ्याचे ढिगारे साचत चालले आहेत. मासळी बाजारातील राहिलेले मासे मांडवी नदीत टाकण्यात येत आहेत. त्याबाबतची याचिका डिसेंबर २००७ मध्ये राजेंद्र पर्रीकर यांनी खंडपीठात सादर केली होती. ही घाण कशा प्रकारे केली जाते याचे छायाचित्रासह पुरावेही त्यांनी न्यायालयासमोर सादर केले होते.
शहरात बिगरगोमंतकीयांचा भरणा होत असून सार्वजनिक ठिकाणी तसेच मांडवीच्या काठावर नैसर्गिक विधी उरकले जातात. तसेच आझाद मैदानाच्या ठिकाणी फूटपाथवर भंगार अड्डे उभारण्यात आल्याचे याचिकेत नमूद म्हटले होते. याची दखल घेऊन न्यायालयाने पणजी महापालिकेला आणि सरकारला नोटीस बजावली होती. त्यावेळी पालिकेने शहरातील सर्व घाण साफ केल्याचे उत्तर न्यायालयात सादर केले होते. तथापि, याचिकादाराने घाणीचे ढीग शहरात अजून कायम आहेत व मांडवी नदीत कुजकी मासळी टाकली जात असल्याचे पुरावेही सादर केले.
न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन शहरातील कचरा २४ तासांत हटवण्याचे आदेश दिले. मात्र, सरकारी आणि पालिकेच्या वकिलांनी ४८ तासांची मुदत मागून घेतली. या विषयी पुढील सुनावणी येत्या बुधवारी ठेवण्यात आली आहे.
Monday 24 March, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment