Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 23 March, 2008

"संसदेतील साठ खासदार गरिबांचे शत्रू!' : चिदंबरम

मदुराई, दि. २३ : "आर्थिक प्रगती फसवणूक करणारी आहे, असे सांगत सरकारच्या आर्थिक धोरणातील प्रत्येक गोष्टींवर टीका करणारे "संसदेतील साठ खासदार' हे गरिबांचे शत्रूच आहेत,''अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे डाव्या पक्षांवर बरसले. "केंद्रात संपुआ आघाडीचे सरकार आहे व आघाडी सरकारची धोरणे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करूनच आखलेली आहेत,'असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
""पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि अर्थमंत्री या नात्याने मी या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक धोरणे आखलेली आहेत. मात्र, आम्ही आखलेल्या या प्रत्येक धोरणात डाव्यांच्या या साठ खासदारांना फक्त दोषच दिसतात. सरकारच्या प्रत्येक उपाययोजनांवर टीका करणे, हेच त्यांचे काम आहे. "अर्थव्यवस्थेतील वाढ फसवी आहे. या वाढीचा फायदा समाजातील काही ठरावीक वर्गालाच होतो,'अशी टीका त्यांच्याकडून सातत्याने सुरूच असते. सरकारची सर्वच धोरणे त्यांना चुकीची वाटत असतील, तर आम्ही नक्की काय करावे, असे त्यांना वाटते? आम्ही देशभरात गरिबीच वाटावी, असे त्यांचे मत आहे काय? बाजाराची, अर्थव्यवस्थेची वाढ फसवी आहे, असे ज्यांना वाटते, ते लोक गरिबांचे आणि या देशाचेही शत्रू आहेत. या वाढीमुळेच सरकार गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी पैसा उभा करीत असते,''असे चिदंबरम् म्हणाले. तंजावर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
""गेल्या चार वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा दर वाढता आहे. ८.८ टक्क्यांवर तो आहे. ही वाढ सातत्याने ९ टक्क्यांच्या आसपास राहिल्यास भावी पिढीला द्रारिद्र्याच्या शापातून मुक्त करता येऊ शकेल. देशातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नातही गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढ झालेली आहे,'' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

No comments: