Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 March, 2010

चर्चिलचे 'जी ७'ला जोरदार प्रतिआव्हान

'माफी मागणार नाहीच; हे तर राष्ट्रवादीचे "मच्छर"
मडगाव दि. १८ (प्रतिनिधी): गोव्यात सध्या विलक्षण गुंतागुंतीच्या बनलेल्या राजकीय परिस्थितीत आणखी तेल ओतण्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादीशी असलेली युती कॉंग्रेसने तोडावी, या भूमिकेशी आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले व त्या संदर्भातील निवेदनाबद्दल आपण कोणाची माफी मागण्याचा प्रश्र्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले. "जी-७' ने वाट्टेल ते करावे, असे म्हणत त्यांनी या गटाची खिल्ली उडविली.
आपण याआधी कधीच कोणाची माफी मागितलेली नाही व यानंतरही मागणार नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ पोकळ धमक्या देण्यापेक्षा हिंमत असेल तर सरळ राजीनामे द्यावेत व स्वबळावर निवडून येऊन दाखवावे असे उघड आव्हानही चर्चिल यांनी दिले.
"जी - ७' गटाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चिल यांनी राष्ट्रवादीच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागण्यासाठी जी दोन दिवसांची मुदत दिली होती त्या संदर्भात चर्चिल यांनी आज हे नवे आव्हान दिले व त्यामुळे एकंदर राजकीय वातावरण आणखीनच गढूळ झाले आहे.
आज दुपारी येथील टूरिस्ट हॉटेलमध्ये तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बांधकाममंत्री "जी - ७' गटाच्या कालच्या मुख्यमंत्र्यांकडील भेटीबाबत आजच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत बरेच संतप्त झालेले दिसून आले. त्यांनी काही इंग्रजी व एका मराठी दैनिकाचा अंक यावेळी दाखवला व सांगितले की, आपण माफी मागावी म्हणून सांगणारे हे कोण लागून राहिले आहेत? आपण कधीच कोणाकडे माफी मागितलेली नाही; एक देव सोडला तर आपण अन्य कोणासमोर नमते घेत नाही; आपण जनतेचा माणूस आहे व वेळ आली तर त्यांच्यासमोरच नमते घेईन. परंतु, अशा कंगाल नेत्यांसमोर आपण कदापि झुकणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या तिन्ही नेत्यांची संभावना त्यांनी "मच्छर' या शब्दांत केली व त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा एक तरी जागा स्वबळावर निवडून आणून दाखवावी असे उघड आव्हान दिले.
या लोकांनी आपल्याकडून माफी मागितली जावी अशी मागणी केली हे वाचूनच आपणाला धक्का बसला, असे सांगून राष्ट्रवादी युतीतून वा सरकारातून बाहेर पडली तरी सरकारला त्याचा कोणताच फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आपण कोणत्या परिस्थितीत कॉंग्रेसमध्ये आलो तेही स्पष्ट केले. आपल्या त्या प्रवेशाबाबत आपण थेट सोनिया गांधींशी बोलणी केली होती व त्याही वचनाला जागल्या. आपणाला मिळालेले खाते हा त्याचाच परिपाक आहे. कॉंग्रेस सरकारने केलेला विकास व जनसामान्यांना मिळालेला त्याचा लाभ यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुकांत मतदार कॉंग्रेसबरोबर राहिला व दक्षिण गोव्यात १९ पैकी १६ जागा या पक्षाला मिळाल्या, असे त्यांनी सांगितले.
चर्चिल आलेमाव बॅकफूटवर?
मडगावः आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडील युतीबाबत केलेले निवेदन हे फक्त जिल्हापंचायत निवडणुकांपुरते होते, विधानसभेसाठी नव्हते,अशी सारवासारव आजयेथे सावर्र्जनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली व क्षणभर पत्रकारही चक्रावले. नंतर त्यांनी आपल्या या निवेदनाची सारवासारव करताना उलटसुलट उत्तरे दिली तर काही प्रश्र्नांवर पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केले. त्यामुळे सध्या चालू असलेल्या राजकीय वावटळीत ते बॅकफूटवर तर गेले नाहीत ना, अशी कुजबुज पत्रकारांमध्ये सुरू झाली.
आजच्या पत्रकार परिषदेतील त्यांचा सारा रोख राष्ट्रवादीवर व प्रामुख्याने मिकी पाशेकोंवर होता. "जी -७' मधील अन्य कोणाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही. नंतर तर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिघाही आमदारांना सरळ "मच्छर' असे संबोधले व राजीनामा देऊन युतीविना निवडून येण्याचे आव्हान दिले.
राष्ट्रवादी बाबत आपण केलेल्या विधानामुळे एवढे वादळ उठलेले असताना कोणीही कॉंग्रेस नेता वा मंत्री तुमच्या समर्थनासाठी का पुढे येत नाही, असे विचारता ते त्यांनाच विचारा, असे ते उत्तरले. तसेच युतीबाबतचे निवेदन पक्षाने करावयाचे होते ते तुम्ही का केले, तसेच पक्ष त्याचे अजून का समर्थन करत नाही, या प्रश्र्नाचे सरळ उत्तर देण्याचे त्यांनी टाळले व आपण लोकांचा माणूस आहे हे पालुपद ते घोळवत राहिले.
राष्ट्रवादीच्या माजोर्डा येथील अधिवेशनात पी. ए. संगमा यांनी थेट प्रधानमंत्र्यांची खिल्ली उडविली होती. पण कॉंग्रेसने त्याची दखल घेतली नाही उलट त्याकडे दुर्लक्ष केले होते. खरे म्हणजे कॉंग्रेसला त्याचे भांडवल करून राष्ट्रवादीला नामोहरम करून सोडता आले असते असेही ते म्हणाले.

No comments: