Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 19 March, 2010

'पंतांच्या आशीर्वादानेच यशस्वी होईन'

...आणि लखोबा लोखंडेच्या पंचरंगी भूमिकेत डॉ. गिरीश ओक
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या पंचरंगी भूमिकेने अजरामर झालेले फिरत्या रंगमंचावरील ""तो मी नव्हेच'' हे नाटक पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर नव्या रूपात येत असून त्यात लखोबा लोखंडेची पंचरंगी भूमिका डॉ. गिरीश ओक साकारणार आहेत. "या नाटकामुळे एका "लिजंड'ची भूमिका मी करणार आहे. "पंत' आणि "ओक' अशी तुलनाही रसिक करणार आहेत आणि तो धोका मी स्वीकारलेला आहे. परंतु, स्वतः पणशीकरांनीच मला या भूमिकेसाठी आशीर्वाद दिले असल्याने ही पंचरंगी भूमिका सहीसही वठवण्यात मी यशस्वी ठरेन', असा विश्वास आज डॉ. गिरीश ओक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाटकाचे निर्माते विजय जोशी व अन्य मंडळी उपस्थित होती.
या नाटकाच्या पटकथेत आणि वाक्यरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परंतु, एका फिरत्या रंगमंचाऐवजी दोन फिरते रंगमंच वापरण्यात आले आहेत. संगीत आणि नेपथ्यामध्येही थोडे फेरफार करण्यात आले आहेत. प्रभाकरपंतांची भूमिका पाहूनच मी प्रभावित झालो आहे. या नाटकाचे सर्वत्र प्रयोग झाल्याने अगदी खेड्यापाड्यांतल्या लोकांनाही ते माहिती आहे. तरीही या नाटकाला आजही रसिकांची "हाउसफुल्ल' उपस्थिती असते', असे ते पुढे म्हणाले.
लखोबा लोखंडे गुन्हेगार आहे; तो आता या भूमिकेसाठी कशा प्रकारची वेषभूषा करून येणार तेही प्रेक्षकांना माहिती असते. पण, ती भूमिका तो कोणत्या शैलीत वठवतो हेच रसिकांना या नाटकात पाहायला जास्त आवडते. आणि म्हणूनच हे नाटक अजरामर ठरले असल्याचे डॉ. ओक बोलताना म्हणाले.
एखाद्या चित्रपटात आणि नाटकात दोनपेक्षा अधिक भूमिका करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण सीरिअल आणि चित्रपटांपेक्षा नाटके करणारा "नाटकी कलाकार' असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. "१९८५च्या दरम्यान याच नाटकात मी "अग्निहोत्री' या एका साक्षीदाराची भूमिका केलेली आहे. त्यामुळे मी हे नाटक बाहेरून आणि आतूनही पाहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर अपेक्षांचे, तुलनेचे आणि जबाबदारीचे ओझे आहे. ते मी यथाशक्ति पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार', असेही ते शेवटी म्हणाले.
आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे संवाद आणि भाषाशैली झेलण्याचा वकूब असलेले खूपच कमी नट आहेत. पंतांनी या नाटकातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ही भूमिका करण्यासाठी केवळ डॉ. ओक यांचेच एकमेव नाव पुढे आले, असे या नाटकाचे निर्माते विजय जोशी यांनी सांगितले. गोव्यात जाणते आणि संगीतप्रेमी प्रेक्षक आहेत. त्यामुळे गोव्यात आणि महाराष्ट्रात नाटक सादर करण्यात फार मोठा फरक आहे; आणि याचीच आम्हांला नेहमी भिती वाटत आली आहे, असेही श्री. जोशी यांनी मिस्कीलपणे सांगितले.
दरम्यान, गोव्यात या नाटकाचे पाच प्रयोग होणार असून दि. १७ रोजी एमपीटी सभागृह वास्को येथे, तर, उद्या दि. १९ रोजी रात्री ९ वाजता हीराबाई झांट्ये सभागृह डिचोली येथे प्रयोग होणार आहे. दि. २० रोजी सायंकाळी ७.३० वाजता दीनानाथ मंगेशकर सभागृह, पणजी येथे प्रयोग होणार असून दि. २१ रोजी ९ वाजता रवींद्र भवन मडगाव व दि. २२ रोजी ९ वाजता रवींद्र भवन कुडचडे येथे या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.

1 comment:

Anonymous said...

it will be a treat.