Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 March, 2010

योग्यवेळी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उखडणार

संरक्षणमंत्री अँटनींची निःसंदिग्ध ग्वाही
वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ४२ दहशतवादी छावण्या उखडण्यासाठी भारत योग्यवेळी पावले उचलणार आहे, अशी निःसंदिग्ध ग्वाही संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
आज सकाळी गोवा शिपयार्डात झालेल्या "विश्वस्त' या गस्तीनौकेचे भारतीय किनारा रक्षक दलाकडे हस्तांतर झाल्यानंतर ते बोलत होते.
भारताला पाकिस्तानसोबत सौहार्दाचे संबंध निर्माण झालेले हवे आहेत. तथापि, तो देश भारताच्या या प्रयत्नांना कसल्याही प्रकारे प्रतिसाद देण्यास तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या द्विपक्षीय संबंधांत कटुता येत चालली आहे, असे त्यांनी सांगितले.
देश सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे लष्कर पूर्ण सक्षम असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या घटनेनंतर देशाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. याकामी मच्छीमार बांधवांकडून लष्कराला उत्तम सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
काश्मिरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तुलनात्मकदृष्ट्या शांतता नांदत आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांचा पोटशूळ उठला आहे. तेथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. मात्र निधड्या छातीने आमचे जवान त्यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
दाबोळी विमानतळ विस्तारीसंदर्भात ते म्हणाले, आमच्याकडून सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. आता विमानतळ प्राधिकरणाने पुढची पावले उचलण्याची गरज आहे.
लष्कराकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता भारतातील खाजगी तसेच इतर व्यवस्थापनांचे सहकार्य घेतले जात आहे. अशा महत्त्वाच्या प्रकरणी अन्य देशांवर अवलंबून राहणे धोकादायक असते. त्यामुळे हा मार्ग अवलंबण्यात आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

No comments: