Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 July, 2008

विश्वासमत सिद्ध करा

डाव्या आघाडीची मागणी
पाठिंबा काढल्याचे पत्र राष्ट्राध्यक्षांना सादर
चर्चेचा मसुदा न दाखविल्याने आमचा अपमान
नवी दिल्ली, दि. 9 - केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत "संपुआ' सरकारला गेल्या चार वर्षांपासून बाहेरून पाठिंबा देणाऱ्या डाव्या पक्षांच्या आघाडीने पाठिंबा काढत असल्याचे पत्र राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे आज दिले. सरकारचा पाठिंबा काढल्याची घोषणा डाव्या आघाडीने कालच केली होती. राष्ट्रपतींना तसे पत्र सादर करून त्यांनी औपचारिकता पूर्ण केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील नागरी अणुऊर्जा सहकार्य करार, गगनाला भिडलेली महागाई, सरकारची अमेरिकाधार्जिणी आर्थिक धोरणे आदी प्रमुख मुद्यांवरून डाव्या पक्षांनी संपुआचा पाठिंबा काढला. "संपुआ सरकार त्यामुळे संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करून दाखवावे,'अशी मागणी डाव्यांनी केली आहे.
डाव्या आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष (आरएसपी) या चार पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीत डाव्यांनी पाठिंबा काढत असल्याचे संयुक्त पत्र दिले तसेच चारही पक्षांनी आपली स्वतंत्र पत्रेदेखील दिली. "पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना लोकसभेत आपल्या सरकारचे बहुमत ताबडतोब सिद्ध करायला सांगण्याचे निर्देश आपण द्यावेत,'अशी मागणी डाव्यांनी राष्ट्रपतींकडेे केली.
""देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या अणुकराराच्या संवेदनशील मुद्यावर संसदेत बहुमताचा आवाज लक्षात न घेता संपुआ सरकारने केवळ अमेरिकेला महत्त्व दिले. या मुद्यावर त्यांनी केवळ अमेरिकेकडेच पाहिले. अणुकराराच्या मुद्यावर सरकारने पारदर्शी कारभार प्रारंभापासून ठेवलाच नाही. अणुकरारावर आयएईएशी होणाऱ्या चर्चेचा मसुदा देखील त्यांनी जाहीर केलेला नाही. चर्चेचा मसुदा दाखविण्याची मागणी आम्ही केली. मात्र, हा मसुदा गोपनीय असल्याचे सांगून त्यांनी तो दाखविण्यास नकार दिला. मसुदा न दाखवून सरकारने आमचा अपमानच केलेला आहे. आयएईएशी होणाऱ्या चर्चेचा मसुदा त्यांनी जाहीर करायलाच पाहिजे,''अशी मागणी माकपाचे महासचिव प्रकाश कारत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
""अणुकराराचा मसुदा सरकार लपवित आहे. या मुद्यावरून सरकार जनतेशी दगाबाजी करीत आहे. हा करार देशविरोधी आहे. अणुकरार एवढा महत्त्वाचा आहे, असे जर सरकारला वाटत होते अर त्यांनी त्या करारातील मसुदा जनतेसमोर मांडायला हवा होता. परंतु त्यांनी असे न करता राजकीय संकट उभे केलेले आहे,''असेही कारत यांनी स्पष्ट केले.
""दोन आकड्यांमध्ये गेलेली महागाई व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये झालेली दरवाढ यामुळे देशातील जनता हैराण झाली असताना केंद्र सरकारने अणुकराराचा मुद्दा रेटून देशात राजकीय संकट उभे केलेले आहे. महागाई कमी करण्याकरिता पाच पावले ताबडतोब उचलण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, सरकारने ती फेटाळून लावली. केवळ अणुकराराच्याच मुद्यावरून आम्ही सरकाराचा पाठिंबा काढलेला नाही. महागाई, पेट्रोलियम पदार्थांच्या भडकलेल्या किंमती खासगीकरण, गुंतवणूक, आर्थिक धोरणे आदी मुद्यांचाही त्यात समावेश आहे,''असेही कारत यांनी सांगितले.
""ज्या सरकारला भारतीय जनतेशी काहीही देणे-घेणे नाही व जे सरकार अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना दिलेले वचन पाळण्यासाठी वाट्टेल ते करायला प्राधान्य देते, अशा सरकारला पाठिंबा देणारा पक्ष म्हणून आम्ही खपवून घेऊ शकत नाही. डावे-संपुआ यांच्यातील समन्वय समितीच्या 16 नोव्हेेंबर 2007 रोजीच्या बैठकीत सरकारने अणुकराराच्या मुद्यावर पुढचे पाऊल न टाकण्याचा शब्द दिला होता, त्याचे उल्लंघन संपुआ सरकारने केलेले आहे,''असेही कारत स्पष्ट केले.
"आयएईएसोबतच्या चर्चेचा मसुदा गोपनीय असल्याने तो दाखविता येणार नाही,'असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल केले होते. त्यांच्या या विधानाकडे कारत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ""आयएईएशी होणाऱ्या चर्चेच्या मसुद्याला गोपनीय घोषित कोणी केले, हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. "चर्चेचा मसुदा गोपनीय ठेवा,'असे सरकारनेच तर आयएईला सांगितलेले नाही ना, हे देखील माहीत करून घेण्याची आमची इच्छा आहे.
आयएईए दुहेरी मापदंड लावत आहे. अमेरिकेसाठी त्यांचा वेगळा मापदंड आणि भारतासाठी वेगळा मापदंड असे आम्ही मानायचे का? कारण आयएईएने अमेरिकेशी नुकतीच चर्चा केलेली आहे. त्यामुळे चर्चेचा मसुदा गोपनीय असूच शकत नाही, असेही कारत म्हणाले.
सपाचा सरकारला पाठिंबा
राष्ट्रपतींना पत्र सादर
नवी दिल्ली, दि. 9 ः डाव्या पक्षांनी केंद्रातील "संपुआ' सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र सादर करून अवघे काही मिनिटे उलटत नाही तोच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची आज भेट घेतली. "संपुआ सरकारला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे,'अशा आशयाचे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना सोपविले.
""उत्तरप्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान समाजवादी पक्ष व संपुआ यांच्यात राजकीय मतभेद झाले होते. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम होते. हे संभ्रम दूर करण्यासाठीच आम्ही राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची आज भेट घेतली. "केंद्रातील संपुआ सरकारला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे,'अशा आशयाचे पत्र आम्ही त्यांना दिले,''अशी माहिती "सप'चे सरचिटणीस अमरसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समाजवादी पक्षाचे बंडखोर खासदार वेणीप्रसाद वर्मा आणि आतिक अहमद यांच्याकडे अमरसिंग यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,"वर्मा आणि अहमद या दोघांचाही पाठिंबा आहे. त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. याशिवाय अपक्ष खासदार बलेश्वर यादव यांचाही सरकारला पाठिंबा आहे.'

No comments: