Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 July, 2008

गोव्याचे नवे राज्यपाल एस. एस. सिद्धू

जमीर यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे
पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - गोव्याचे वादग्रस्त राज्यपाल एस. सी. जमीर यांना अखेर गोव्याच्या जबाबदारीतून मोकळे करण्यात आले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा पूर्णवेळ ताबा देण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल एस.एस. सिद्धू यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेचे माजी सरसचिव असलेले सिद्धू हे 1952 सालच्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी आहेत.
राष्ट्रपती भवनातून आज रात्री जारी झालेल्या आदेशानुसार एकूण तीन राज्यांच्या राज्यपालपदांचे बदलण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रभा राव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. गेले काही दिवस प्रभा राव व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातील सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे प्रभा राव यांना अखेर हिमाचल प्रदेशात पाठवून केंद्राने विलासरावांची सुटका केल्याचे तेथील नेत्यांचे मत आहे.
नागालॅण्डचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले एस. सी. जमीर यांची गोव्यात राज्यपालपदी नेमणूक झाल्यानंतर सुरुवातीस त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार बरखास्त करून खळबळ माजवली होती. जमीर हे पूर्णपणे कॉंग्रेस पक्षाचे दूत या नात्यानेच कार्यभार हाकत असल्याची टीका विरोधी भाजपने केली होती. त्यांची सुरक्षा व इतर मनोरंजनात्मक गोष्टींवर होणारा अफाट खर्च हा गोव्यात टीकेचा विषय बनला होता. त्यामुळेच भाजपने "जमीर हटावो, गोवा बचावो' आंदोलन राज्यभर राबवून त्यांच्या ऐषोरामी वर्तनाची जंत्रीच जनतेसमोर सादर केली होती.
2003 साली गोव्यात नेमणूक झालेल्या जमीर यांनी विधानसभेत विश्वासमत प्राप्त करूनही पर्रीकर यांचे सरकार बरखास्त केले होते. यानंतर गेल्यावेळी दिगंबर कामत सरकार अल्पमतात असताना त्यांना बहुमत सिद्ध करण्यास न सांगता विधानसभाच तहकूब करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्यपालांनी घेतला होता. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार अल्पमतात असूनही केवळ सभापती व राज्यपाल यांच्या आशीर्वादाने हे तग धरून होते, हे पुढे सिद्ध झाल्याने राज्यपालांविरोधात भाजपने दिल्लीत राष्ट्रपतीनाही निवेदन सादर केले होते. जमीर यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे राज्यपालपदावरही टीका होऊ लागल्याने अखेर राष्ट्रपतीनी त्याची दखल घेऊन त्यांचे स्थलांतर शेजारील महाराष्ट्रात करण्याचे ठरवले असावे, अशी शक्यता विरोधी भाजपने वर्तविली आहे. "उशिरा का होईना पण अखेर न्याय मिळाला' या शब्दात भाजपने त्यांच्या बदलीच्या आदेशाचे स्वागत केले आहे. भाजपने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर न्याय मिळाल्याचे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस रूपेश महात्मे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार पेचात
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार डाव्यांनी पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात आले आहे व इकडे राज्यपाल एस.सी.जमीर यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्याने विद्यमान दिगंबर कामत सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. सरकार पाडण्याचा कोणताही पर्याय नसल्याने एवढे दिवस मूग गिळून बसलेले काही नाराज नेते पुन्हा एकदा सक्रिय बनण्याची शक्यता असून केंद्रातील अस्थिरतेचे पडसाद गोव्यातही उमटण्याची दाट शक्यता येथील राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

No comments: