Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 7 July, 2008

काबूल हादरले

भारतीय दूतवासाजवळ स्फोटात, 41 ठार, 141 जखमी
चौघा भारतीयांचा समावेश
तालिबान की आयएसआय?
अफगाणमधील भारतीय चिंतीत
जगभरातून घटनेचा निषेध

काबूल, दि. 7 - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे भारतीय दूतावासाजवळ आज सकाळी झालेल्या आत्मघाती कारबॉम्बस्फोटात सुमारे 41 जण ठार झाले असून 141 लोक जखमी झाले. त्यात चौघा भारतीयांचाही समावेश आहे.
जे अधिकारी काबूल स्फोटात मारले गेले त्यात ब्रिगेडीयर आर.डी.मेहता, कॉन्सुलर व्यंकटेश्वर राव यांचा समावेश आहे. अन्य दोन भारतीयांमध्ये अजय पठानिया आणि रूपसिंग यांचा समावेश आहे. सोबतच दूतावासातील नियामतुल्लाह हा कर्मचारीही मारला गेला. पण, तो मूळ अफगाणचा रहिवासी आहे.
या हल्ल्याने तालिबानचे भारताविषयीचे घातक मनसुबे समोर आले असून अमेरिकेचा मित्र देश म्हणून भारतावर सूड उगविण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. पण, अफगाणी अधिकाऱ्यांनी यामागे आयएसआयचा हात असल्याचे म्हटले आहे. भारतासह संपूर्ण जगात या हल्ल्याचा निषेध होत असून अफगाणिस्तानात कार्यरत भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा आता या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि अफगाणी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हल्लेखोरांनी अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या समोर असणाऱ्या भारतीय दूतावासाबाहेर व्हिसा घेण्यासाठी उभ्या असलेल्यांच्या रांगेत कार घातली. त्याक्षणी जबरदस्त स्फोट झाला. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या स्फोटामुळे दूतावासाची भिंत कोसळली आणि इमारतीचेही नुकसान झाले. या स्फोटामुळे दूतावासातील सुरक्षा कर्मचारी, व्हिसा घेण्यासाठी आलेले लोक मुख्यत्वेकरून लक्ष्य ठरले. अगदी शेजारीच असलेल्या बाजारातही आलेल्या लोकांना या स्फोटाचे परिणाम भोगावे लागले.
पोलिसांच्या मते, हा आत्मघाती कार बॉम्बस्फोट असावा. पण, अद्याप मृतांचा निश्चित आकडा त्यांनी कळवलेला नाही. 28 जण ठार तर 141 लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र जखमींचा आकडा 170 हून अधिक असल्याचे एका खाजगी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. यात चार भारतीयांचा समावेश असून दोन जण लष्कराचे अधिकारी आहेत. अन्य तीन जण वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला असून घटनास्थळी अमेरिकी सैनिकही ताबडतोब पोहोचले. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. पण, यामागे तालिबानचा हात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अणुकराराचा मुद्दा कारणीभूत?
भारत-अमेरिका यांच्यात अणुकरार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. अमेरिकेसोबत संबंध ठेवणाऱ्यांना तालिबान आपला शत्रू मानून लक्ष्य बनविणार असल्याच्या यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या. अफगाणिस्तानात अमेरिकी हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती सावरण्याच्या कामी भारतीय कंपन्या अमेरिकेला मदत करीत आहेत. तालिबानने आतापर्यंत अनेकदा भारतीय अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे अपहरण केले आहे. तसेच त्यापैकी अनेकांची हत्याही केली आहे.
भारताकडून निषेध
अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाचा भारताने निषेध नोंदविला असून तेथे कार्यरत भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे.
मुखर्जींनी बोलाविली तातडीची बैठक
काबूलमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी एक तातडीची बैठक बोलाविली. त्यात संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव, संरक्षण तसेच विदेश विभागातील अनेक उच्चाधिकारीही सहभागी होते. या बैठकीत एक भारतीय प्रतिनिधीमंडळ तातडीने काबूलला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रतिनिधी काबूलमधील स्थितीचा आढावा घेणार आहेत. सोबतच, या हल्ल्यात ठार झालेल्या भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठीही हे प्रतिनिधीमंडळ प्रयत्न करणार आहे. भारत सरकार या मुद्याबाबत अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानात सुमारे चार हजार भारतीय कार्यरत आहेत. अशावेळी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.

No comments: