Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 9 July, 2008

जगदीशसिंग पोलिसांना शरण

अमृतसरहून शस्त्रे आणल्याची कबुली
मडगाव दंगल

मडगाव,दि. 8 (प्रतिनिधी) - मोतीडोंगरावरील बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणातील फरारी आरोपी जगदीशसिंग आज मडगाव पोलिसांना शरण आला. पोलिस गेल्या रविवारपासून त्याच्या शोधात होते. त्याच्या मागावर एक पथक बेळगावपर्यंत जाऊन आले होते, पण तेथे तो न सापडल्याने पोलिसांनी तेथे असलेले त्याचे वडील प्रेमसिंग यांना चैाकशीसाठी गोव्यात आणले होते. पोलिसांची ही युक्ती यशस्वी ठरली व गेले तीन दिवस त्यांना चकवत असलेला जगदीशसिंग आज स्वतःहून पोलिसांत हजर झाला.
त्याला अटक करून रिमांडवर घेण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची जबानी नोंदवून घेतल्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.
त्याने 17 तलवारी अमृतसरहून आणून बशीरकडे साडेचार महिन्यांपूर्वी सोपवल्याची कबुली दिली. मात्र इतके दिवस त्या तलवारी कोठे होत्या, असा प्रश्र्न उपस्थित झाला आहे. त्याच्या कबुलीनुसार साडेचार महिन्यांपूर्वी बशीर त्याला येऊन भेटला व त्याने तलवारींची मागणी केली. त्यानंतर आपण अमृतसरला गेलो. तेथून तलवारी घेऊन
बसने दिल्लीला गेलो. तेथून रेल्वेने गोव्यात आलो व त्या तलवारी बशीरच्या स्वाधीन केल्या.
यापेक्षा आणखी तलवारी आणल्याचा त्याने इन्कार केला आहे. अजून त्याचा कबुली जबाब संपलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी अधिक तपशील मिळण्याची शक्यता आहे. त्याने गोव्यात आणखी कोठे अशी शस्त्रे पुरवली आहेत काय याचा तपासही सुरू असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
दरम्यान जगदीशसिंग काही तरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण शस्त्रांची मागणी नोंदवण्यासाठी बशीर नेमका त्याच्याकडेच कसा पोहोचला हा प्रश्र्न जसा निर्माण होतो तसाच प्रश्र्न कुडचडे येथील दंगलीच्यावेळी वापरल्या गेलेल्या तलवारी, शिरवडे व दोन महिन्यांपूर्वी मालभाट येथील मशिदीत दोन गटांत झालेल्या हाणामारीवेळी झालेला तलवारींचा वापर लक्षात घेता पूर्वींपासून तलवारी आणल्या जात होत्या व त्याच्याशी जगदीशसिंगचा संबंध आहे की काय त्या दृष्टीने पोलिस तपास सुरू झाला आहे.
दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिक्षक रवींद्रसिंग यादव यांनी सुरक्षेशी कोणतीच तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करताना राज्यात कोणत्याही घटनांना धार्मिक वा जातीय रंग येणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. लोकांनी निर्भयपणे वावरावे व व्यापाऱ्यांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू करावेत असे आवाहन करताना प्रसारमाध्यमांना या कामी महत्त्वाची भूमिका बजावता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले.

No comments: