Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 10 June, 2010

'त्या' दलितबांधवांची उपेक्षा थांबवा : शंभू भाऊ बांदेकर

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पेडणे पालिका क्षेत्रातील सुर्बानवाड्यावरील दलितबांधवांची विहीर दुरुस्ती व गणेशविसर्जन तळीच्या कामावरून जी काही हेळसांड सुरू आहे त्याची गंभीर दखल दलित संघटनेतर्फे घेण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी हा प्रकार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नजरेस आणून दिला असून त्याबाबत तात्काळ तोडगा काढावा,अशी विनंती केली आहे.
राज्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकमेव पेडणे मतदारसंघातीलच दलितबांधवांची सतावणूक सुरू आहे. सुदैवाने पेडणेचे पालकमंत्री तथा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकमेव धारगळ मतदारसंघाचे आमदार बाबू आजगावकर हे राज्याचे पंचायतमंत्री आहेत. बाबू आजगावकर मंत्री असूनही गेले कित्येक महिने सुर्बानवाड्यावरील दलितबांधवांच्या विहीर दुरुस्तीच्या या विषयावर तोडगा निघत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. पेडणे पालिका व देवस्थान समितीच्या वादात या दलितबांधवांची फरफट सुरू आहे.विधानसभेत पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर पालिकामंत्री ज्योकीम आलेमाव यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. आता महिने उलटले तरी अद्याप यावर तोडगा निघत नाही.बाबू आजगावकर यांच्याकडूनही याविषयीचा पाठपुरावा केला जात नसल्याने दलितांच्या नेत्याकडूनच दलितांकडे दुर्लक्ष होत असल्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, अशी या लोकांची नाराजी आहे.
दरम्यान, बाबू आजगावकर यांच्याकडून जरी दुर्लक्ष होत असले तरी पेडणेचे माजी आमदार तथा माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी या दलितबांधवांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न केले आहेत.
दरम्यान,कॉंग्रेस पक्षाचे कार्यकारिणी सदस्य असलेले शंभू भाऊ बांदेकर यांनी यापूर्वीही ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.एकाबाजूने सरकार तीन वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा साजरा करीत असताना दुसऱ्या बाजूला दलितबांधवांची या सरकारकडून पिण्याच्या पाण्यासाठी अशी उपेक्षा होणे ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे श्री.बांदेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.नगरपालिका व देवस्थान समिती यांच्यात समेट घडवून दलितांच्या या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी विनंती श्री.बांदेकर यांनी केली आहे.

No comments: